पान:गांव-गाडा.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति      ३५


स्थानिक अधिकाऱ्यांच्या कामाची तपासणी करतात, व प्रसंगविशेषीं तेही ती कामें करतात.

 वतनदार अधिकारी असण्याची आवश्यकता ज्या कारणांमुळे जातिजातींना वाटू लागली, त्याच कारणांमुळे ती गांवांनाही वाटू लागली; आणि इष्ट तो फेरफार करून जात-वतनदारांच्या नमुन्यावर गांवानें जातिपरत्वे आपआपले वतनी हुद्देदार कायम केले. वतनपद्धति गांव-गाड्याने जातीपासून उचलली किंवा जातीजातींनी ती गांवगाड्यापासून उचलली हे निश्चयाने ठरविण्यास अगोदर गांवें वसली किंवा अगोदर जाती बनल्या हे समजले पाहिजे. गांवांत कायमची वस्ती करून राहिलेल्या जाती जरी पुष्कळ आहेत तरी हल्लीच्या सुरक्षित राज्यांतही शेकडों फिरत्या जाती दृष्टीस पडतात. कायमच्या धंद्याची आवश्यकता व वृद्धि ह्यांमुळे ह्या फिरत्या जातींनाही स्थाईक होणे भाग पडत आहे; आणि वंजारी, कैकाडी, जोशी, तिरमल, घिसाडी, वड्डर वगैरे जाती आपापल्या सोयीप्रमाणे कांहीं गांवांत घरेदारे करून राहिल्या आहेत. ह्यावरून असा ग्रह होतो की, अगोदर जाती निर्माण होऊन त्या भटकत भटकत सोयीसोयीने गांवांत स्थिरावल्या असाव्यात, आणि जातवतनदारीचा ठसा गांवमुकादमानीवर उमटला असावा. राजाची गादी वंशपरंपरेनें चालते हे पाहून समाजव्यवस्था अखंड चालविण्यासाठी जातीजातींनी आपापले कामगार वतनी केले, व जाति-पोटजातींची संख्या सहस्रावधि असल्यामुळे गांवोगांव वतनी जात-कामगार फडकू लागले. जातीचे अधिकार आधुनिक मताप्रमाणे निर्भेळ सामाजिक नसून त्यांनी राजसत्ता व धर्मसत्ता ह्यांचाही पुष्कळसा भाग व्यापला आहे. तेव्हां जातिजातींनी मान्य केलेल्या वतनपद्धतीची मुळे राजसत्ता व धर्मसत्ता ह्यांतही ओघानेंच शिरली. गुणांवरून राजाधिकारी व धर्माधिकारी नेमण्याचा प्रघात असतो. आपल्या देशांतही एका काळी तो तसाच असला पाहिजे. पण समाज ज्या संस्था पसंत करतो त्यांचा प्रवेश राज्यव्यवस्था व धर्मव्यवस्था ह्यांत झाल्याशिवाय रहात नाही. एकंदर लोकप्रवृत्ति वतनाकडे