पान:गांव-गाडा.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४      गांव-गाडा.


जमातीस आमंत्रण करणे, जातगंगेपुढें अपराध्यास धरून आणणे, पंचायत जमल्यावर पाटलापुढे कंबर बांधून उभे राहणे, पाटलाला पहिल्याने टिळा अंबर लावणे व विडा देणे, पाटलापुढे सर्व स्वयंपाकाची भांडी मांडणे, व त्याचा हुकूम झाल्यावर जातीला जेवण्यास बसण्याला सांगणे इत्यादि कामें चौगुल्याची होत. जातपंचायती बहुधा तोरणादारी किंवा मरणादारी होतात. कांहीं कनिष्ठ जातींच्या-विशेषतः अठरा पगड भिकार जातींच्या-पंचायती मढीच्या कान्होबाच्या वार्षिक यात्रेच्या वेळीही होतात. त्यांत लिहिण्यावाचण्याचे बहुधा अनुष्टुप असते. सर्व कारभार तोंडातोंडी चालतो. पाटलाच्या कामाच्या ह्या स्वरूपावरून 'तोंड-पाटिलकी' म्हणण्याची रूढि पडली असावी. लिहिण्याचे काम पडलेच तर तें ज्या गांवीं जमात जमते तेथील ग्रामजोशी किंवा कुळकर्णी याजपासून करून घेतात. नुकसानीची भरपाई, सोडचिठ्ठी किंवा ज्याची बायको त्याकडे पाठविणेंं, दंड अगर जेवण घेणेंं, वाळीत टाकणेंं इत्यादि शासने जात करते. दंडाच्या रकमेचा विनियोग जातीच्या एखाद्या कार्याकडे किंवा देऊळ, धर्मशाळा, चावडी, जातीची भांडी खरेदी करणे वगैरे बाबींकडे करतात. कांहीं जातींत दंडाची रक्कम जात-कामगारांना मिळते. न्हाव्यांत जर चार रुपये दंड घेतला तर त्यांतली पावली चौगुल्यास व बाकी मेहेतऱ्याला मिळते. पुण्याकडील सुतारांत देशमेहेतऱ्याला दोन रुपये, चौगुल्याला एक रुपया आणि जेथे जमात जमते तेथल्या देशमुखाला रुपया ह्याप्रमाणे अद्याप बटवडा होतो. कुडमुडे जोशांच्या पंचायतीत जो दंड वसूल होतो त्यांतला रुपया दोन रुपये पाटील ठेवतो, आणि बाकी रकमेचे गहूं घेऊन ते जातींत घरोघर वांटतात. गोंड लोकांत व्याभिचार वगैरेबद्दल रुपया दोन रुपये दंड जात घेते, व तो खाण्यापिण्यांत उडविते. फांसपारध्यांत छिनालीबद्दल १५ ते १२५ रुपये दंड होतो. त्यातला निंमा पाटील घेतो व निंमा जातींतले गोरगरीब. “तळी तापडी"(त्रस्त), व इतर जमात ह्यांना वांटून देतात. वर जे सरपाटील, मामलेदार,महाल मेहतरे, कसबेदार सांगितले ते आपापल्या अधिकाराच्या स्थलसीमेंतील