पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संशोधनाच्या बाबतीत इतका मागे पडला नसता.
 संशोधनात मागे पडण्याला आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. इंग्रज इथे आला आणि ज्या देशामध्ये नदीवरील पूलसुद्धा आम्हाला माहीत नव्हता, फक्त सांडवे आणि साकव माहीत होते त्या देशामध्ये पुलावर रुळ टाकून त्या रुळांवरून आगगाड्या धावू लागल्यानंतर एक इतकं नवीन जग सगळ्या हिंदुस्थानच्या पुढे आलं की आपण पाश्चिमात्य जगाशी याबाबतीत तुलना करू शकतो हे अशक्य आहे असं वाटू लागलं.
परभृत इंडिया
 १८५७ सालापर्यंत इंग्रजांनी जातिव्यवस्था तोडण्याकरिता खेडेगावात शाळा काढून ब्राह्मणी व्यवस्थेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. १८५७ च्या उठावानंतर इंग्रजांनी जातिव्यवस्थेला हात लावायचा नाही असं धोरण धरलं. अशा वेळी जुन्या काळातील व्यवस्था हाती असलेली ब्राह्मणक्षत्रीय अशी मंडळी कोणत्या कामाला लागली? त्यांच्याकडे शब्द होता. संस्कृत होता त्याच्याऐवजी इंग्रजी शब्द त्यांनी घेतला. इंग्रजांनी हिंदुस्थानचे व्यापाराने शोषण करण्याचा जो कारखाना उघडला होता त्यात आपली भागीदारी घेतली. मग परदेशात जी काही यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान मिळेल ते घ्यायचं आणि उद्योग सुरू करायचा असं त्यानी केलं. त्याला काही कष्ट करायला नको, संशोधन करायला नको. मालही परदेशातून आणायचा आणि तो इथल्या लोकांना फायद्याने विकायचा. या तऱ्हेने इंडिया तयार झाला. परदेशात तयार होणाऱ्या वस्तूंची नक्कल करण्याची प्रवृत्ती हिंदुस्थानात इतकी प्रचंड वाढली की गेली कित्येक वर्षे हिंदुस्थानातल्या सगळ्या भाषांतले कवी म्हणजे इंग्रजी भाषेतल्या कवितांचं रूपांतर करणारे असं झालं! आचार्य अत्र्यांनी त्यांच्या एका व्यंगकाव्यात तत्कालीन चोरकवींचे वर्णन -
 पुढे कवन लेखनी कुशल चोर तो जाहला
 स्वतंत्र कृतीचा कवी म्हणुनी मान्यता पावला। असे केले आहे.
 अगदी कथाकादंबरीकारसुद्धा इंग्रजी साहित्यात डल्ला मारणारे झाले. आमचे अर्थशास्त्रज्ञही तसेच. आणि आमचे संशोधक म्हणजे तिकडे झालेलं संशोधन मिळवून तेच वापरणारे. अशी परभृतता निर्माण झाली.
इंडियन पेटंट ॲक्ट = चोरीची मुभा

 या बाबतीत नेहरूसरकारच्या धोरणाचा सारांश म्हणजे 'इंडियन पेटंट

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
७९