पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणसाचे वेगळेपण : प्रयोगशीलता
 माणसाच्या या करामतीमागे त्याच्या स्नायूंची ताकद किंवा लवचिकता तर आहेच, पण ही असली ताकद माणसापेक्षासुद्धा उदंड प्रमाणात असणारे कितीतरी प्राणी पृथ्वीतलावर आजही मौजूद आहेत. माणसाचा पूर्वज ज्या दिवशी दोन पायांवर उभा राहिला तेव्हा तर असे प्राणी आजच्यापेक्षाही फार मोठ्या संख्येने असले पाहिजेत. पण, त्या प्राण्यांना जे जमले नाही ते माणसाने करून दाखविले. आहारनिद्राभयमैथुनाच्या समाधानात थोडीशी जिज्ञासा, थोडीशी नकलेगिरी, थोडीशी हिम्मत, तेच तेच काम त्याच त्याच पद्धतीने करण्याचा कंटाळा या आणि अशा इतर प्रवृत्तीतून माणसाच्या बुद्धीचीही उत्क्रांती होत गेली.
 वणव्यात तयार मिळणारा अग्नी घरात संगोपून ठेवण्याचे कसब जमायलाच हजारो वर्षे गेली. चाकाचा शोध लागला. हत्यारे समजली. स्वत:च्या ताकदीला पशुंच्या ताकदीची जोड मिळाली. शेती सुरू झाली. आणि त्यानंतर वाढत्या गतीने एक एक नवे नवे कसब, एक एक नवे नवे रहस्य, शोध, सिद्धांत प्रस्थापित झाले. मनुष्यजातीच्या इतिहासात माणसाचे सामर्थ्य आणि वैशिष्ट्य त्याच्या शोधक बुद्धीत आणि प्रयोगशीलतेत आहे. त्याच्या इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत स्वत:चा गुणाकार करणाऱ्या जनावरांच्या मदतीने त्याला एक टप्पा गाठता आला. मनुष्यप्राण्याचाच गुणाकार करणाऱ्या मानुषींनी शेतीचा शोध लावून दुसरा टप्पा साध्य केला. शेतीतील गुणाकाराने संघटना आणि साधनांची मुबलक उपलब्धी सिद्ध झाली. आणि त्यानंतरच्या टप्प्यात शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि संशोधक यांनी ऊर्जेच्या गुणाकारांच्या हजार युक्त्या संपादन केल्या. या सगळ्या इतिहासात पशु, स्त्रिया आणि शेतकरी यांची धडगत काही बरी लागली नाही. गीतेने तर त्यांना स्वर्गाचा हक्कसुद्धा मोठ्या मिनतवारीने दिला. गुणकशक्तीचे मालक गुलाम होतात असा आजवरचा इतिहास आहे. संशोधकांचीही तीच गत होते, का आपल्या बुद्धीच्या ताकदीवर संशोधक स्वत:चे शोषण टाळू शकतात, हे अजून पाहावयाचे आहे.
ज्ञान लपविण्याच्या परंपरेचा देश

 जळणारी काठी हातात घेऊन तिचा वापर जनावरांना

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
३१