पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गळून पडली आहेत, कड्या निखळल्या आहेत, कोणी पहारेकरीही राहिलेला नाही. अगदी कैदेतून बाहेर काढण्याकरीतासुद्धा कुणी नाही. आपल्याच हातांनी दरवाजा ढकलून, आवश्यक तर निखळवून बाहेर पडायचे काम करायचे आहे.
 छत्रपतींच्या स्वराज्यस्थापने-नंतरच्या रामदासांच्या वचनांत सांगायचे तर

 बुडाला 'इंडिया' पापी
 दुष्ट-संहार होतसे
 बळिराज्य येतसे आता
 आनंदवनभुवनी

 बळिराज्य म्हणजे काही शेतकऱ्यांचे स्वर्गराज्य नाही. जेथे कोणताच अन्याय नाही, शोषण नाही अशी आदर्श समाजव्यवस्था, चिरंतन टिकणारी, कधी पृथ्वीवर अवतरेल हे असंभवच नव्हे तर अशक्य आहे. बळिराज्य ही कल्पना दिशेच्या संकल्पनेसारखी आहे. आपण 'पूर्वेकडे' असे म्हणतो. पण पूर्व म्हणजे काही एका कोणा विवक्षित ठिकाणी ठेवलेली नाही. ती दिशा आहे. तसेच 'बळिराज्य' ही दिशा आहे; व्यवस्था नाही. बळिराज्याची दिशा कोणती? निसर्ग आणि त्यातील ऊर्जास्रोत यांतून मनुष्यप्राण्याच्या श्रमाने जगण्याकरिता आवश्यक ती साधनसामुग्री तयार करावी. उत्पादन असे करावे की कालच्यापेक्षा आज जास्त पिकावे पण त्यासाठी उद्याच्या सृष्टीवर विपरीत परिणाम घडू नये. वाढत्या उत्पादनातून माणसास वेगवेगळी साधनसामुग्री आणि समाजव्यवस्था अशी जोडता यावी की त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा सतत चढत्या राहतील. ही बळीराज्याची दिशा आहे. आजपर्यंत उत्पादन वाढविण्याचे भरकस प्रयत्न झाले, उत्पादन वाढलेही. अगदी निसर्गाशी शत्रुत्व साधूनसुद्धा उत्पादन वाढवले गेले. पण वाढत्या उत्पादनाचा लाभ काही थोड्या देशांच्या आणि प्रत्येक देशातील मूठभर लोकांना झाला. आता हे लोभी दूर झाले असे धरले तर आपण ज्या दिशेने फरफटत चाललो होतो ती दिशा सोडून बळीराज्याची दिशा नेमकी पकडायची कशी?

 शेती पराकोटीच्या कार्यक्षमतेने करणे म्हणजे काटकसरीने करून अधिकाधिक उत्पादन घेणे. असे करतांना निसर्ग हा आपण आपल्या

१८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने