पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांचाही या श्रेयामध्ये मोठा वाटा आहे.
 माझ्या आतापर्यंतच्या लिखाणात अण्णासाहेब शिंदे यांचे नाव श्रेयनामावलीत घालण्याचे माझ्याकडून राहून गेले. ही चूक कशी झाली समजत नाही. खरे तर ३० जानेवारी १९८० ला मी श्रीरामपूर येथे त्यांच्या घरी भेटायला आलो होतो. तेव्हा त्यांनी माझे म्हणणे अत्यंत शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, 'शरदराव, शेतीमालाला भाव मिळत नाही कारण तसा भाव मिळावा अशी राजकीय कांक्षाच नाही.' मंत्रीमंडळात असलेला मनुष्य हे स्पष्टपणे सांगतो याचा किती भयानक अर्थ होतो? अर्थ स्वच्छ आहे. शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या कर्जात जन्मल्या, कर्जात जगल्या आणि कर्जात मेल्या. याचे कारण त्यांनी असेच मरावे ही राजकीय बुद्धी होती. थोडा जरी प्रामाणिकपणाचा अंश असता तरी त्यावेळी काँग्रेसचे जे कोणी शेतकरी आईबापांच्या पोटी जन्मलेले मंत्री होते त्यांनी पटापट राजीनामे दिले असते. पण, अशी भलतीच अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही.
 मंत्री असताना अण्णासाहेब शिंदे यांनी जे काम केले ते माझ्या नजरेतून सुटण्यास, त्यांच्याबद्दल पूर्वग्रहदूषितपणा येण्यास आणखीही एक कारण असावे. आमची भेट झाली त्यावेळी आमच्या ज्या आंदोलनाची उभारणी चालू होती ते सहकारी साखर कारखान्यांच्या विरोधात झाले. सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांना उसाचा रास्त भाव देत नाहीतच, पण सहकारी साखर कारखान्यांमुळे, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू नये अशी योजना राबविणे सरकारला अधिक सुकर झाले अशी माझी भूमिका आहे आणि सहकाराच्या विरोधातील या भूमिकेमुळे अण्णासाहेबांच्या इतर कर्तृत्वाकडे माझे दुर्लक्ष झाले.
 'प्रचलित अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचे भवितव्य' असा विषय आज माझ्यासमोर आहे. प्रचलित अर्थव्यवस्था म्हणजे आजची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचे भवितव्य म्हणजे शेतकऱ्यांची उद्याची परिस्थिती असे दोन वेगवेगळ्या काळातले मुद्दे आहेत. या दोघांचा संबंध जोडायचा मी जो प्रयत्न केला आहे तो थोडक्यात मांडतो.

 अण्णासाहेब शिंदे यांची इतिहासामध्ये नेमकी जागा काय? अण्णासाहेबांना पूर्णपणे जाणून घेण्यात माझी चूक झाली होती; पण

१२४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने