पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२. प्रचलित अर्थव्यवस्था व शेतकऱ्यांचे भवितव्य


 हिमालयातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर्वप्रथम शेर्पा तेनसिंगने जिंकले. पण, एव्हरेस्ट जिंकल्यानंतर शेर्पा तेनसिंग Spent Force झाला. नंतर कित्येक जणांनी एव्हरेस्ट सर केले. तेनसिंगचे नाव विस्मरणात गेले; वाहून गेलेल्या धबधब्यासारखे.
 एका अर्थाने मीही Spent Force झालो आहे. मी १९८० साली श्रीरामपूरला आलो होतो तेव्हा अण्णासाहेब शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना सांगितले की, देशाच्या गरिबीचे कारण म्हणजे शेतकऱ्यांची गरीबी आहे. शेतकऱ्यांच्या गरीबीचे कारण शेतीमालाला भाव नाही हे आहे, आणि शेतीमालाला भाव नाही याचे कारण शेतीमालाला भाव मिळता कामा नये असे सरकारी धोरण आहे. या माझ्या विधानाला आणि भूमिकेला त्यावेळचे, वि. म. दांडेकरांपासून सगळे अर्थशास्त्रज्ञ विरोध करीत होते; कोणीही राजकारणीसुद्धा त्याला मान्यता देत नव्हता. उसाचा लढा चालू झाल्यानंतर 'उसाला जर ३०० रुपये टन भाव दिला तर साखर कारखाने सगळे मोडीत काढायला लागतील' असे आजचे मान्यवर नेते त्यावेळी म्हणत होते. आज निवडणुकीचे जाहिरनामे पाहिले तर जाहिरनामा कोणत्याही पक्षाचा असो 'शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे' हे कलम त्यात असतेच. आणि म्हणून मी Spent Force झालो आहे.

 डंकेल प्रस्तावावर हिंदुस्थानात जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा 'भारताने जागतिक बाजारपेठेत ताकदीने प्रवेश केला पाहिजे आणि त्याकरिता डंकेल प्रस्तावाच्या रूपाने एक चांगला दरवाजा उघडतो आहे' म्हणून त्याचे समर्थन करणारा सबंध देशात मी एकटा होतो – डॉ. मनमोहनसिंग नव्हते, डॉ. मुखर्जी नव्हते. ही सर्व मंडळी आपली व्यवस्था सुरक्षित असावी, लोकांना काहीतरी संरक्षण असावे, खुल्या व्यवस्थेत आपण टिकणार नाही अशी भूमिका मांडणारी होती. मग, जवळजवळ दोन वर्षांच्या चर्चेनंतर हिंदुस्थान सरकारने जागतिक व्यापार संघटने (WTO) च्या करारावर सह्या केल्या आणि मग सगळे खुल्या व्यवस्थेबद्दल बोलू लागले. एव्हरेस्ट सर झाले आणि शेर्पा तेनसिंग Spent Force झाला.

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१२१