पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीच उपयोग नाही. हिंदुस्थान अण्वस्त्रधारी देश झाला. अण्वस्त्रांचा वापर करण्याचा आदेश देण्याचे एक बटण पंतप्रधानांच्या हाती आले तर त्याचा ते उपयोग कधी आणि कसा करू शकतील?
 पाकिस्तानातून काश्मिरात घुसलेल्या आतंकवाद्यांनी पाचशेहजार हिंदुची कत्तल केली; पंतप्रधान अणुबटण दाबतील? काश्मिरमध्ये घातपात्यांच्या झुंडीच्या झुंडी पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसविल्या, स्थानिक लोकांच्या पाठिंब्यामुळे ते यावेळी श्रीनगरपर्यंत चालून आले; पंतप्रधान अणुबटण दाबतील? पाकिस्तानची विमाने अमृतसर-लुधियाना-अंबालापर्यंत बाँबवर्षाव करू लागली, पंतप्रधान अणुबटण दाबतील?

 दोन्ही देशातील युद्ध एकाचा सपशेल पाडाव आणि दुसऱ्या देशाने त्याचा सर्व मुलुख व्यापणे आणि तेथे आपली सत्ता बसवणे अशा तऱ्हेने होणेच शक्य नाही. तेव्हा, अगदी निर्वाणीचा मार्ग म्हणूनदेखील युद्धप्रसंगात अणुबाँबचा काही उपयोग नाही. भाजपा सरकारला राष्टीय सुरक्षेची खरी चिंता असती तर त्यांनी अणुचाचण्या किंवा आधुनिक विमाने, तोफा यांच्या उपयोगावर आधारलेली संरक्षणनीती सोडून साऱ्या लष्कराची पुनर्रचना करण्याचे काम हाती घ्यायला पाहिजे होते. हिंदुस्थानची संरक्षण दले पूर्णत: व्यावसायिक रचनेची आहेत. युद्ध सुरू झाले की फौजा लढतात, लोक बातम्या ऐकत राहातात. ही शस्त्रास्त्रांची 'मॅच' दोनतीन आठवड्यांपलीकडे चालणार नाही याची सर्वांना खात्री असते. १८ ते २५ वयोगटातील सर्व तरुणांना सक्तीचे लष्करी शिक्षण आणि युद्धकाळात प्रत्येक तरुणास आघाडीवर जाण्यासाठी बोलावण्याची व्यवस्था आणून लष्कराची पुनर्रचना केली तर छोट्या स्वयंचलित बंदुकांच्या वापराने भारताची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत झाली असती. उत्तम स्वयंप्रेरित बंदुका हर जवानाच्या हाती देणे ही राष्टीय सुरक्षेच्या दृष्टीने अणुबाँबपेक्षा कितीतरी पटीने परिणामकारक ठरेल. पण, अणुस्फोट केल्याची घोषणा करण्यात जो थाटमाट आहे आणि राजकीय भांडवल करण्याची शक्यता आहे ती अशा घोषणेने थोडीच होणार आहे? जवान लढतात तोपर्यंत सुरक्षेची महती गाणारे आपल्या पोटच्या पोरांना किंवा स्वत:ला आघाडीवर जाण्याची वेळ येणार आहे हे समजले तरी त्यांचा सूर कायम ठेवतात काय, हे पाहाणे मोठे मनोरंजक होईल.

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
११७