पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बंधनवाद्यांची नैतिकता
 कायद्याने किंवा कृत्रिम बंधनांनी सुधारणा घडत नाहीत असे स्वतंत्रतावादी मानतात; कायदा केल्याचे दुःख नाही पण त्यामुळे कायदा मोडणारेही सबळ बनतात आणि सरकारशाहीदेखील फोफावते असे मानतात. त्यामुळे स्वतंत्रतावाद्यांना बंधने नकोत; ते उच्छृखलतेला उत्तेजन देतात; थोडक्यात, स्वतंत्रतावाद म्हणजे अनैतिकतेला पाचारण अशी अनेकांची समजूत आहे.
 जीवाची सुरुवात गर्भाशयात होते. गर्भावस्थेत आईचे सगळे शरीर गर्भाची जोपासना करण्यात लागलेले असते. आई उपाशी राहिली तरी गर्भ उपाशी रहात नाही. पोषणासाठी गर्भाशयातील ते छोटेसे बाळ काहीच प्रयत्न करत नसेल असे नाही; त्याच्या जीवाच्या मानाने ते आकांतही करत असेल. जन्माची वेळ झाली म्हणजे बाळ मोठ्या अनिच्छेने गर्भाशयाच्या बाहेर पडते. आईच्या शरीराबाहेरची सारीच परिस्थिती गर्भाशयातील सुखद उबदार सुरक्षित अवस्थेपेक्षा अगदी उलट. बहुधा या कारणानेच असावे, सर्व माणसांच्या मनात पुन्हा एकदा गर्भावस्थेचा अनुभव घेण्याची सुप्त पण प्रबळ इच्छा कायम राहात असावी. गर्भावस्थेत सगळे काही न मागता मिळाले; शैशव आईबापांच्या लाडाकोडात संपले; बालपणात गुरुजनांनी शरीराबरोबर बुद्धीचीही जोपासना करण्यात मदत केली. तारुण्य आले की गर्भावस्था संपली, आता आपण स्वतंत्रपणे आयुष्याचा अनुभव घ्यायचा आहे ही आकांक्षा बहुतेकांच्या मनात तयारच होत नाही. काही आईवडिलांच्याच छायेत वावरतात; काहींना पराक्रम गाजवण्याची इच्छा असते, पण त्यासाठी कुटुंब, जात, धर्म, राष्ट- यांच्या प्रतिष्ठेचा आधार लागतो. कुटुंबाकरिता जगणेमरणे, राष्ट्राकरिता जगणेमरणे यांतील उदात्तता पिढ्यांनी मान्य केली आहे. सर्व देशातील सर्व भाषांतील सावरकरादि प्रतिभाशाली कवींनी या भावनेला सर्व प्रभावी शब्दांत गुंफले आहे. कुटुंबापासून राष्ट्रापर्यंत समुदायभक्तीमध्ये एक मोठी सोय आहे. पराक्रमाच्या उर्मीला वाव तर मिळावा पण जीवनाचा अर्थ काय, आयुष्य कशासाठी या त्रासदायक प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी पडू नये अशी यात दुहेरी सोय आहे.

 याच प्रेरणेतून बंधनवाद्यांची नैतिकता उद्भवते. नीति म्हणजे काय?

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२११