पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक ३
आध्यात्मिक नव्हे, ऐहिक साधना
 स्वतंत्रता कोणा एका देशाची जायदाद नाही; मनःपूतवाद व भांडवलवाद आणि स्वतंत्रतेच्या आकांक्षांचा काही संबंध नाही हे स्पष्ट झाल्यावरही आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे स्वातंत्र्याची आकांक्षा ही काही आध्यात्मिक चैतन्यवादी प्रेरणा नाही.
स्वातंत्र्याचा अवधूती आविष्कार
 देशासाठी किंवा अन्य ध्येयासाठी गजाआड तुरुंगात कोंडलेल्या कैद्यांनी अनेक काव्यांतून आपले मनोगत व्यक्त केले आहे. आमच्या शरीराला अडकवून ठेवाल, हातपाय बेड्यांनी जखडून ठेवाल; पण आमचा आत्मा, आमचे मन जगभर भराऱ्या घेण्यास मोकळे आहेत, ते तुरुंगाच्या भिंती ओलांडून विश्वसंचार करू शकतात इत्यादी इत्यादी.
 शरीर बंधनात असले म्हणजे शरीर आणि मन यांच्यात काही द्वैत आहे असा आभास म्हणा, भास म्हणा, तयार होतो. अनेक तत्त्वज्ञांनी शरीर आणि आत्मा यांच्यातील भिन्नता आग्रहाने मांडली आहे. शरीर हे खोटे आहे, माया आहे, आभास आहे; शेंबडात माशी अडकून पडावी तसे आत्मा या मायाजालात अडकून पडला आहे; त्यातून सुटण्याची आत्म्याची धडपड आहे; एका जन्मात हे साध्य झाले नाही तर जन्मजन्माच्या तपश्चर्येने जडाच्या बंधनातून मुक्त व्हावे, मोक्ष मिळावा अशी आत्म्याची धडपड चालू असते. ही अशी अध्यात्मवादाची किंवा चैतन्यवादाची मांडणी सहस्रावधी वर्षे राहिली आहे.
 आत्मा विशुद्ध स्वरूपात सर्वज्ञ आहे; त्यावरील जड शरीराच्या आवरणाने अज्ञान तयार झाले आहे. शरीररूपी छिद्रातून सत्याचा वेध घेण्याचा प्रयत्न विफल राहणार, तेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडि-पूंच्या तावडीतून शरीराची मुक्तता केली की मोक्ष प्राप्त झाला; या अशा स्वातंत्र्यासाठीची धडपड हा सगळ्या विश्वाच्या इतिहासाचा खराखुरा अन्वयार्थ आहे ही चैतन्यवादाची मांडणी आहे. मोक्षाची धडपड आणि स्वतंत्रतावादाची धडपड यात सरेआम गल्लत झाली आहे.

 चांगले जगावे, चांगले खावे, चांगले प्यावे, मुलाबाळांचे कोडकौतुक

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२०३