स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक २
निसर्गाचे कुटुंबनियोजन
'स्वतंत्रतावाद' हे काही विलायती वाण आहे ही समजूत प्रत्यक्षात किती
चुकीची आहे हे स्पष्ट झाले. अशी चुकीची समजूत होण्याचे एक महत्त्वाचे कारण
आहे. 'स्वतंत्रतावाद' म्हणजे बाजारपेठेवर आधारलेली व्यवस्था; 'स्वतंत्रतावाद'
म्हणजे डार्विनवाद, स्वतंत्रतावाद म्हणजे इतिहासात बदनाम झालेला 'लेसे
फेअर'वाद (ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे करू देणे किंवा 'अ-
हस्तक्षेप'वाद); थोडक्यात, स्वतंत्रतावाद म्हणजे भांडवलवादी साम्राज्यशाहीची
पहिली पायरी असाही समज होतो. हा गैरसमज सर्वदूर पसरलेला आहे.
'डार्विनवाद', 'अ-हस्तक्षेपवाद', किंवा भांडवलवाद-साम्राज्यवाद हे सारेच
विलायती उपजेचे. त्यामुळे स्वतंत्रतावाद हे काही देशी पीक नाही, ते येथे रूजू
शकणार नाही, भारतासारख्या देशात 'नायकप्रधान' पूर्वजांची पूजा बांधणारा
विचार किंवा व्यवस्थाच मूळ धरू शकेल या समजाला पुष्टी मिळते.
तगेल तो जगेल
स्वतंत्रतावादाविरुद्धचे हे आरोप, खरे म्हटले तर, निव्वळ शिवीगाळ
आहे. डार्विनवाद म्हणजे काय? जड पदार्थातून सजीव प्राण्यांना लागणारे
मूलभूत रसायन हजर झाले की सजीव प्राण्यांचे विविध प्रकार प्रजोत्पादनाच्या
पिढ्यांमागून पिढ्यात संख्याशास्त्रीय नियमानेच तयार होतात. कालाच्या
प्रवाहात किरणोत्सर्गी पदार्थांच्या अपघाताने काही वेळा अचानक आणि
विचित्र असे बदलही होऊ शकतात. पण विविधता ही निसर्गसिद्ध आहे.
जन्माला आलेल्या विविध प्राण्यांतून सगळेच टिकून राहणे अशक्य आहे.
कारण, एवढ्या सगळ्यांचा भार पेलणे पृथ्वीस शक्य नाही. सर्व सजीवांच्या
सर्वच इच्छांची पूर्ती करायची म्हटले तर पृथ्वी चटणीलासुद्धा पुरणार नाही.
अनेकांच्या इच्छा अनेक आणि त्या पुऱ्या करण्याची साधने मात्र मर्यादित.
अशा परिस्थितीला तोडगा काय?
पहिला तोडगा निसर्गच काढतो. पृथ्वीवरील साधने संपादण्यात, वापरण्यात काही विशेष सामर्थ्य, कौशल्य दाखवणारे सजीव आपले स्वत:चे रक्षण करू शकतात, पोषण करू शकतात, प्रजोत्पादन करू शकतात.