पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा ब्राह्मणांचा मान तेवढाच मोठा. अर्थार्जनात प्रभुत्व वैश्यांचे. राजाने धन जमवायचे, पण ते यज्ञात वाटून टाकण्याकरिता. शासनाच्या श्रमविभागणीला येथे मान्यता होती. ती विभागणी जन्माच्या अपघाताच्या आधाराने केली गेली हे आजतरी दुर्दैवी आणि विचित्र वाटते. पण, चातुर्वर्ण्याच्या चुकीच्या पायावर का होईना, शासनाची श्रमविभागणी हे भारतीय परंपरेचे वैशिष्ठ्य राहिले आहे.
 श्रमविभागणीची ही परंपरा मुसलमान आक्रमणापासून खंडित झाली. परकीय शासन अ-राज्यवादी असूच शकत नाही. आपले राज्य टिकविण्यासाठी सर्वंकष सत्ता हाती घेणे परकीय आक्रमकांना आवश्यक बनते. अ-राज्यवादाला ग्रहण मुसलमानी आक्रमणापासून लागले. इंग्रज राज्यातही ते चालू राहिले, पण इंग्रजी साहित्याच्या संपर्काने 'व्यक्ती'ला मान्यता मिळू लागली.
 गांधीजींचे सगळे आंदोलनच अ-राज्यवादावर आधारलेले होते. सरकार किमान असावे अशी अगदी टोकाची भूमिका ते मांडत. हिंदुस्थानातून इंग्रजांना काढून का टाकायचे? इंग्रज गेला म्हणजे स्वातंत्र्य मिळते असे नाही. प्रत्येकाला आपल्या अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाचा परिपोष करण्याची संधी देते ते स्वातंत्र्य. अशी स्वतंत्रता राजकीय पारतंत्र्यात जगूच शकत नाही म्हणून राजकीय स्वातंत्र्याचे महत्त्व. इंग्रजी अंमल संपविणे हा अ-राज्यवादातील पहिला टप्पा असल्याचे गांधीजी आग्रहाने सांगत.
 दुर्दैवाने, गांधीजींचा राजकीय वारसदारच अ-राज्यवादाचा हत्यारा ठरला. पारंपरिक समाज, जात, राष्ट- असल्या समूहांना दूर करून समाजवादी राष्ट-ाचे सर्वश्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा नेहरूनी प्रयत्न केला. महत्त्व व्यक्तीचे नाही, सरकार महत्त्वाचे आहे; व्यक्तीच्या प्रेरणा स्वार्थी असतात; त्यांवर मात सामूहिक नियोजनानेच करता येते असली अजागळ समाजवादी मांडणी करून शिष्योत्तमाने समूहवाद जोपासला.

 समाजवादाचा पाडाव झाल्यानंतर, पुन्हा एकदा दयानंद-विवेकानंद प्रेरणेचे हिंदुत्ववादी नवा समूहवाद, शासनवाद आणू पाहात आहेत. समाजवादाची दुर्बलता त्याच्या आर्थिक कमजोरीत होती. शासनवादाला असला आर्थिक फूटपट्ट्यांचा जाच सोसणारा नाही. राष्ट-ासाठी काय करायचे

१९४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने