पुढे गेली आणि आपल्या देशात मात्र परिस्थिती अशी की बुरुडातल्या एका
उपजातीतील माणसे म्हणतात आम्ही फक्त चौकोनीच टोपल्या विणतो, गोल
टोपल्या विणत नाही अशा तऱ्हेची संकुचित वृत्ती इथे तयार झाली.
श्रमविभागणीची संकल्पना
कोणी कोणत्या वस्तुचे उत्पादन करावे, कोणी कोणते काम करावे
यासाठी अर्थशास्त्राचा नियम काय? जो एखादे काम करण्यात कुशल आहे,
कार्यक्षम आहे त्याने ते करावे; पण कामाची वाटणी (श्रमविभागणी) करण्याने
कामाची उत्पादकता वाढते हा अर्थशास्त्रातील पहिला सिद्धांत. उदाहरणार्थ
एका माणसाने टाचणी करण्याकरिता तार ओढायची, ती तोडायची, एक टोक
बोथट करायचे, दुसरे अणकुचीदार करायचे अशी सगळी कामे जर तो करीत
बसला तर तो दिवसात किती टाचण्या तयार करतो आणि या प्रत्येक कामाला
श्रमविभागणीच्या पद्धतीने वेगळा वेगळा मनुष्य लावला तर ते सरासरी प्रत्येकी
किती टाचण्या तयार करतात हे पाहिले तर श्रमविभागणीमुळे उत्पादकता
कितीतरी पटींनी वाढलेली दिसते. तेव्हा, ज्याने त्याने, ज्या ज्या देशाने
आम्हाला लागते ते आमचे आम्ही उत्पादन करू असे म्हटले तर ते त्या त्या
देशांच्याही फायद्याचे नाही आणि जगाच्याही फायद्याचे नाही.
कामाची वाटणी कशी करावी? उदाहरणार्थ, समजा 'अ' आणि 'ब' हे दोन देश आहेत. 'अ' देशात कापूस 'ब' देशापेक्षा खूप चांगला पिकतो, कार्यक्षमतेने तयार होतो; आणि 'ब' देशात साखर चांगली तयार होते, 'अ' देशात ती तेवढ्या कार्यक्षमतेने तयार होत नाही. 'ब' देशाला साखर तयार करण्यात काही फायदा असेल तर 'अ' देशाने साखर तयार करण्याच्या भानगडीत विनाकारण न पडता 'ब' देशाकडून साखर घ्यावी. त्यामुळे 'ब' देशाचाही फायदा होतो आणि 'अ' देशाचाही फायदा होतो. एवढ्याने प्रश्न सुटत नाही. समजा, अशी परिस्थिती असली की 'ब' देश आणि साखर या दोन्ही उत्पादनांच्या बाबतीत अधिक कार्यक्षम आहे. अशा वेळी मग काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर समजण्याकरिता अजून एक उदाहरण घेऊ. आईनस्टाईनची प्रयोगशाळा कामाच्या व्यापांमुळे, समजा, घाणेरडी रहायला लागली, कचराकुचरा साचू लागला. साफसफाईला वेळ मिळत नसल्याने त्या कामासाठी मोलकरीण ठेवली. तीही इतर नोकरदारांप्रमाणे काम उरकून