वर्षे शरणागती स्वीकारावी लागल्यामुळे ही पराभूत मनोवृत्ती खोल रुजली
आहे.
ॲडमिरल पेरीने जपानी सम्राटाच्या राजमहालावर तोफ डागली आणि
सारा जपान खडबडून जागा झाला; आपला सम्राट सूर्याचा वंशज असला तरी
पाश्चिमात्यांच्या विज्ञानविद्येपुढे त्याचे काही चालत नाही हे त्यांनी पक्के
ओळखले. आणि, त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान व उद्योगधंदे या साऱ्या क्षेत्रात अशी
काही हनुमानउडी घेतली की, आता जपानशी स्पर्धा करणे अमेरिकेसारख्या
देशासही अनेक क्षेत्रात जमत नाही.
आंतरराष्ट-ीय व्यापार संस्थेच्या वाटाघाटींसाठी हिंदुस्थानचे जे
प्रतिनिधीमंडळ जाईल त्यात प्रामुख्याने नोकरमाने सरकारी अधिकारी किंवा
लिखापटी तज्ज्ञ मंडळी असणार; त्यांच्या मनात व्यापाराविषयी विजिगीषु तर
सोडा, पण युयुत्सु मानसिकतासुद्धा उपजण्याची काही शक्यता नाही.
प्रतिनिधीमंडळातील मुत्सद्दी अर्थव्यवस्थेतील उद्योजकतेचा फारसा अनुभव
नसलेले असणार हे तर खरेच. आजपर्यंतच्या आंतरराष्ट-ीय वाटाघाटींत याची
कोणाला फारशी जाणीव झाली नाही पण, आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेच्या
वाटाघाटींच्या गेल्या म्हणजे युरुग्वे फेरीत पहिल्यांदा शेतीमालाच्या
व्यापाराविषयी चर्चा झाली आणि हिंदुस्थानी मुत्सद्द्यांची या क्षेत्रातील
आणखी एक कमजोरी प्रकाशात आली. शेती, शेतीमालाचे उत्पादन, व्यापार,
प्रक्रिया इत्यादिसंबंधी या 'साहेबी' मुत्सद्द्यांच्या गाठी किमान आकडेवारीसुद्धा
असणार नाही.
आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी देशादेशांतील वाटाघाटी संयुक्त
राष्ट-संघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे, पन्नासहून अधिक वर्षांवर चालू
आहे. वाटाघाटींची आठवी फेरी 'युरुग्वे फेरी' म्हणून गाजली आणि त्याची
फलश्रुती म्हणून जागतिक व्यापारसंस्था निर्माण झाली. या सगळ्या वाटाघाटी,
संस्था, चर्चा यांचा हेतु काय आहे?
व्यापारक्षेत्रात साऱ्या देशातील सरकारे हस्तक्षेप करतात, या हस्तक्षेपामुळे देशादेशांत सर्वोत्तम श्रमविभागणी होण्यात व्यत्यय येतात. जो तो आपले घोडे पुढे काढू पाहतो आणि जमल्यास शेजारच्या स्वाराच्या घोड्याचे पाय मोडण्याचे प्रयत्न करतो. असल्या संकुचित स्वदेशी धोरणातून अंततोगत्वा