पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या वेळी नाना देवरूखमध्ये व्यापाराचे प्राथमिक धडे घेत होते आणि नानांची आई 'मातृ मंदिर' नावाची अनाथ, निराधार स्त्रियांचा सांभाळ करणारी एक संस्था आहे इंदिराबाई हळबे नावाच्या एक परिचारिका असल या बाई त्या काळामध्ये कुमारीमातांचा सांभाळ करायच्या. कधीकधी इंदिराबाईंना मोठी अडचण यायची आणि कोणीतरी हाताखाली लागायचं. तुम्हाला माहीत आहे की देवरूखसारख्या गावी त्या काळामध्ये, १९२०-२५ चा काळ तुम्ही आठवा, गांधीयुगाचा काळ आठवा... त्या काळामध्ये ब्राह्मण वर्गातील स्त्री जात-पात माहीत नसलेल्या स्त्रीचं बाळंतपण करते, ही साधी गोष्ट नव्हती. जिला समाजानं वाळीत टाकलेलं आहे, जिला समाजाने नाकारलेलं आहे अशा कुमारीमातेच्या बाळंतपणासाठी इंदिराबाई हळबेंना हात देणारी स्त्री, अलीकडच्या डॉक्टरी भाषेमध्ये त्याला ‘वॉश घेणे' असं म्हणतात. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात तेव्हा त्यांना मदत करण्याची ती एक क्रिया आहे - तर वॉश घेण्याचं काम करणाऱ्या नानांच्या आई होत्या. नानांचं कुटुंब तर कमठे ब्राह्मणाचं कुटुंब. आई मोठी धामिर्क, सोवळं वगैरे घरात. व्रतवैकल्ये घरामध्ये अशा बाईने, या माउलीने खरा धर्म, जाती-धर्मापलीकडे असणारा खरा मानवतेचा धर्म, एक आदर्श म्हणून नानांना आपल्या आचरणातून घालून दिला.
 त्यानंतर नानांवर मोठे संस्कार जर कुणाचे झाले होते तर त्यांच्या वडीलबंधूचे समतानंद गद्रे यांचे. त्यांचे संपूर्ण नाव सांगायचं झालं तर अनंत हरी गद्रे. अनंत हरी गढ्यांना ‘समतानंद' का म्हणायचे तर त्यांनी कोकणच्या परिसरामध्ये त्या काळात समतेचा प्रसार केला. कसा प्रसार करायचेत? तुम्ही जर इतिहासाची पाने चाळायला लागलात तर तुमच्या असं लक्षात येईल की, समतानंद गद्रेंना कोकणामध्ये लोक ‘झुणका-भाकर गद्रे' असं म्हणायचे. ‘झुणका-भाकर गद्रे' कशासाठी? तर ते त्या वेळी सत्यनारायणाची पूजा घालायचे आणि सत्यनारायणाच्या पूजेनंतर सार्वजनिक सहभोजन

आयोजित करायचे. सहभोजनाचं वैशिष्ट्य असे की, त्या सहभोजनाला जात-पात, धर्म कसल्याही प्रकारचा विचार न करता सगळ्यांनी एका पंक्तीत बसायचं आणि जेवायचं. जेवणाचा बेत झुणका-भाकर असायचा. कोकणासारख्या कर्मठ भूमीमध्ये अनंत हरी गद्र्यांनी सत्यनारायणाची पूजा घालून त्या काळात सगळ्यांना एका अर्थाने बाटवण्याचा उद्योग केला होता. मी ‘बाटवण्याचा' हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. कारण समाजातील जाती-धर्माच्या भिंती धर्माच्याच नावाखाली मोडण्याचा मोडण्याचा दूरदर्शीपणा अनंत हरी गद्र्यांनी केलेला होता. हे अनंत हरी गद्रे खरं तर टिळकांच्या पठडीत वाढलेले. टिळक किती कर्मठ होते हे मी तुम्हाला सांगायला नको.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/३४