Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघशक्तीची उपासना । २८१

योजना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सभेत मांडली. अशा रीतीने टिळकांनी केलेल्या परिश्रमांचें जीज होऊन लोकशक्ति जागृत झाली व संघटितहि झाली.
मुकुटधारण-विधि
 यामुळे कृतार्थता वाटून लो. टिळकांनी केसरींत पुढच्या आठवड्यांत लेख लिहिला. ते म्हणतात, "शुक्रवार, २९ डिसेंबर १९१६ हा दिवस हिंदी राष्ट्राच्या इतिहासांत निदान- ब्रिटिश रियासतीच्या इतिहासांत- सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा उगवला याविषयी शंका नाही. कारण त्या दिवशी हिंदी स्वराज्याचें निशाण लखनौ येथे गोमती नदीच्या तीरावर रोवलें गेलें... शुक्रवारचा ठराव म्हणजे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय आकांक्षेने केलेला मुकुटधारण-विधीच होय! या समारंभाला तिची सर्व प्रजा आपापला नजराणा घेऊन हजर होती. हिंदुस्थानांतील असा एकहि वर्ग नसेल की, ज्याचे प्रतिनिधि या समारंभास आले नव्हते. जातिभेद, मतवैचित्र्य, व्यक्तिद्वेष वगैरे राष्ट्रीय- कार्योच्छेदक पिशाचांनीहि गोमतीच्या प्रवाहांत गति घेतली व नवीन शुभदेह धारण करून समारंभास मंगल आशीर्वादच दिला.... आपलें राजकीय हृद्गत हुडकून काढण्याला या राष्ट्राला पांच पन्नास वर्षे लागली खरी, पण तें हृद्गत त्याचें त्याला आता कळून आलें. आणि गेल्या शुक्रवारी सर्व राष्ट्राने एकमुखाने त्याचा एवढा मोठा उच्चार केला की, त्याचा आवाज जगभर पसरला. आता त्याला त्याचा विसर पडणें शक्यच नाही; आणि त्याच्या हातून पुढे जो उद्योग होणार तो हे हृद्गत सफल होण्याकरिताच होईल यांत शंका नाही."
 तीस वर्षांनी, मध्यंतरी अनेक व्याघात आले तरी, टिळकांची ही भविष्यवाणी खरी ठरली.
 पण त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत राष्ट्रीय दृष्टीचा लोप होत चालला आहे. जातिभेद, मतवैचित्र्य, व्यक्तिद्वेष, इत्यादि राष्ट्रीय- कार्योच्छेदक पिशाचें पुन्हा जोर करून उठलीं आहेत. या वेळीं एवढेच म्हणावेंसें वाटतें की -

'लोकमान्यांचे आठवावें रूप'

 नाही तर प्राचीन ग्रीस, रोम या लोकसत्ता ज्या मार्गाने गेल्या, सध्याच्या नवोदित लोकसत्ता ज्या मार्गाने चालल्या आहेत, त्याच विनाशाच्या मार्गाने भारतीय लोकसत्तेला जावें लागेल. त्यामुळे त्या लोकसत्तेच्या आद्य प्रणेत्याच्या अंतरात्म्याला फार क्लेश होतील.