Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८० । केसरीची त्रिमूर्ति

सर्वं नवोदित लोकसत्ता धडाधड कोसळून पडत असतांना भारतीय लोकसत्ता अजूनहि एक प्रबळ पक्ष टिकवू शकत आहे, याचें सर्व श्रेय टिळकांनी वाणीने, आचरणाने व त्याग-बुद्धीने भारतीयांच्या मनावर जे संस्कार केले त्याला आहे.
आम्ही होमरूलर
 १९०५ ते १९०८ या तीन वर्षात स्वदेशी व बहिष्कार ही चळवळ टिळकांनी जशी जागृति व संघशक्ति या तत्त्वांवर चालविली होती तशीच १९१६ ते १९२० ह्या चार वर्षांत होमरूलचीहि चळवळ जागृति व संघशक्ति याच तत्त्वांवर चालविली होती. २८ एप्रिल १९१६ या दिवशीं बेळगावला होमरूल लीगची रीतसर स्थापना झाली. ॲनी बेझंट यांनी मद्रासला आधीच स्वतंत्रपणें होमरूल लीगची स्थापना केलीच होती. त्यामुळे आता फिरून जोमाने लोकशिक्षणाच्या व जागृतीच्या कार्यास प्रारंभ झाला. त्याचे परिणामहि लगेच दिसूं लागले. बेझंटबाईंच्या 'न्यू इंडिया' पत्राकडून सरकारने जामीन घेतला व तीन महिन्यांच्या आंत ती रक्कम जप्तहि केली; शिवाय त्यांच्यावर मुंबई प्रांतांत येण्याची बंदी घालण्यांत आली. लो. टिळकांवरहि राजद्रोहाचा खटला भरण्यांत आला. त्यांची बेळगाव व अहंमदनगर येथील भाषणें सरकारला फार आक्षेपार्ह वाटली. सरकारविषयी त्यामुळे अप्रोति व द्वेष निर्माण होतो, व हा राजद्रोह आहे, असा आरोप त्यांच्यावर होता; पण हायकोर्टाने टिळकांना ह्या सर्व आरोपांतून मुक्त केलें.
 या सर्वांमुळे लोक अधिकाधिक निर्भय होत चालले. पुढे बेझंटबाईंना अटक झाल्यावर चळवळीला अधिक जोम चढून तिला सत्याग्रहाचें रूप आलें. स्वराज्याची मागणी बेकायदेशीर असेल तर आम्ही ती करीत आहों व होईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहों, असें लोक जाहीर सभा भरवून सांगू लागले व जिल्ह्या जिल्ह्यांतून तशी पत्रकें स्वराज्य संघाकडे धाडूं लागले. आश्चर्याची गोष्ट अशी की, सर सुब्रह्मण्य अय्यर, सुरेंद्रनाथ, बॅ. जीना, यांसारखे मवाळहि आपण स्वराज्यावादी असल्याचे जाहीर करून पत्रकावर सह्या करूं लागले. अलाहाबादचे सी. वाय्. चिंतामणि हे तर स्वराज्य संघाचे स्वतः सभासद झाले व काँग्रेस भक्तांनाहि त्यांनी तशी विनंती केली; आणि अशांतच १९१६ सालच्या डिसेंबरमध्ये लखनौला काँग्रेसचें अधिवेशन झालें आणि सर्व राष्ट्र एकमुखाने स्वराज्याची मागणी करीत आहे, असें अद्भुत दृश्य तेथे दिसून आलें.
लखनौ
 काँग्रेस सर्व धर्मांची, सर्व पक्षांची, सर्व जातींची- सर्वांची- आहे असें टिळक प्रथमपासून सांगत होते. लखनौला त्यांचें हें म्हणणें साकार झालें. मुस्लिम लीगनेहि स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा दिला. बहुतेक सर्व मवाळ पुढाऱ्यांनी ती मागणी उचलून धरली. ब्राह्मणेतरहि बहुसंख्येने सामील झाले, आणि सर्वांनुमते मंजूर झालेली