Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७८ । केसरीची त्रिमूर्ति

स्वराज्याचा प्रश्न लोकांपुढे प्राधान्याने मांडून दादाभाईंनी राष्ट्रीय सभेस जहाल करून सोडलें."
 स्वदेशी-बहिष्काराच्या चळवळीच्या लाटेंतून राष्ट्रीय सभेला बाहेर काढण्यांत कलकत्त्याला नेमस्तांना यश आलें नाही. तरी त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत; आणि रासबिहारींना अध्यक्ष करून तोच डाव पुन्हा सुरतेला त्यांनी टाकला; आणि त्यामुळेच तेथे राष्ट्रीय सभेचें ऐक्य भंगलें. तिच्यांत दोन फळया झाल्या.
मी तडजोडवादी
 या वेळी मवाळांशी समेट करावा, राष्ट्रीय सभा भंगूं नये म्हणून टिळकांनी फार प्रयत्न केले. सभेच्या अधिवेशनाच्या आधी दोन दिवस स्वतः टिळक, लजपतराय, खापर्डे हे सुरेंद्रनाथ, मालवीय इत्यादि नेमस्ताग्रणीकडे हेलपाटे घालीत होते; पण त्यांनी या नेत्यांशीं अपमानास्पद वर्तन केलें. त्यामुळे टिळकांनी असला अपमान सोसून पुन्हा मवाळांच्याकडे खेटे घालू नयेत, असें त्यांच्या जहाल पक्षाच्या अनुयायांना वाटत होतें. त्यांच्यापैकी 'महाराष्ट्रा'चे संपादक श्री. ओगले हा विचार टिळकांना सांगण्यासाठी त्यांच्याकडे गेलेहि, पण टिळकांनी त्यांना सांगितलें की, "समेट होत असेल तर हजार वेळा अपमान सोसण्यास मी तयार आहें. मी कांही स्वतःसाठी समेटाची याचना करीत नाही. देशाचें काम आहे, आणि आपलें खरें भांडण सरकारशी आहे, मवाळांशीं नाही. त्यांच्याशी भांडतांना शक्य तितकें ताणूं, पण तुटेपर्यंत ताणण्यांत अर्थ नाही. मी तडजोडवादी आहे हे लक्षांत ठेवा." (आठवणी, खंड २, पृ. ३२४).
ऐक्यासाठी मानहानि
 पण टिळकांनी कलकत्त्याला नव्या राष्ट्रीय पक्षाची स्थापना करून स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ही जीं पक्षाचीं चार मुख्य तत्त्वें म्हणून सांगितली होतीं त्यांतलें एकहि मवाळांना मान्य करणें शक्य नव्हतें. म्हणून तडजोड होऊं शकली नाही. पुढे काँग्रेसच्या अधिवेशनांत दुफळी झाल्यानंतरहि मोतिलाल घोष यांनी पुन्हा समेटाचा प्रयत्न केला. ती वेळ तर टिळकांच्या कसोटीची होती. मोतिलाल म्हणत होते, "तुम्हीं कांग्रेस मोडली, ऐक्यभंगाला तुम्ही कारण झाला, असें मवाळ म्हणत आहेत, तें तुम्हीं मान्य केलेंत, तसे लिहून सही करून दिलीत, तर समेटाला मवाळ तयार आहेत. मला माहीत आहे की, त्यांचें म्हणणें खरें नाही, पण ऐक्य टिकविण्यासाठी तुम्हीं हें करावें, असा माझा आग्रह आहे." या वेळीं राष्ट्रीय पक्षाच्या लोकांनी या सूचनेला तीव्र विरोध केला; पण टिळकांनी मोतिलालांचा आग्रह मानला व तसे लेखी लिहून दिलें. मोतिलाल म्हणतात, "या त्यागाला, या मनोधैर्याला तोड नाही. देशासाठी केवढी मानहानि त्या पुरुषाने पत्करली! ही उदात्तता असामान्य आहे." (ए स्टेप इन दि स्टीमर, प्रस्तावना, पृ. ९).