Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७२ । केसरीची त्रिमूर्ति

जात आहेत, लोक हद्दपार झाले आहेत, याने जर तुमचें मन निग्रही बनत नसेल तर तुमची गणना पशूंत करावी लागेल." (व्याख्यानें पृ. ५१).
 लोकमान्यांनी प्रवर्तित केलेलें जें नवें राजनीतिशास्त्र त्याचें स्वरूप असें आहे. ज्या शास्त्राचें पर्यवसान स्वराज्यांत होतें ते राजनीतिशास्त्र अशी त्यांनीच त्याची व्याख्या केली आहे. त्याला नवें असें म्हणण्याचें कारण हें की, अशा तऱ्हेचें राजनीतिशास्त्र भारताच्या इतिहासांत कधीहि, कोणींहि सांगितलेलें नव्हतें. सर्व देशासाठी आपण कांही करावयाचें आहे, ती आपली जाबाबदारी आहे, हा विचारच भारताला नवा होता. अखिल देशाच्या उत्कर्षापकर्षाचें चिंतन कोणी करीत नसल्यामुळे औद्योगिक पारतंत्र्य, परदेशी जाणारा पैसा, सरकारने केलेली लूट याचा कोणीं अभ्यासच कधी केला नव्हता. आणि जुलमाचा, अन्यायाचा प्रतिकार सामान्य- जनांनी संघटित होऊन करावयाचा असतो हें तर कोणाच्या स्वप्नांतहि नव्हते. आगरकर, टिळक बर्वे-प्रकरणांत तुरुंगांत गेले तेव्हा, हा लष्करच्या भाकरी भाजण्याचा उद्योग यांना कोणीं सांगितला होता? असा लोकांना प्रश्न पडला होता. विष्णुशास्त्री यांनी त्यावर कडक टीका केल्याचें मागे सांगितलेच आहे. त्यानंतर पंधरा-सोळा वर्षांनी टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली तेव्हाहि त्यांच्या निकटवर्तीयांना तसाच प्रश्न पडला होता. हा नसता उद्योग कशासाठी? राष्ट्रकार्य हा अजूनहि नसता उद्योग वाटावा अशी या देशाची स्थिति होती. तेव्हा बहिष्कार, कायदेभंग, करबंदी, निःशस्त्र प्रतिकार ह्या कल्पना लोकांना किती अपरिचित होत्या हें कळून येईल; आणि असा हा नसता उद्योग हद्दपारी, फाशी पत्करूनहि केला पाहिजे असें राजनीतिशास्त्र टिळकांना सांगावयाचें होतें. या देशांत त्यांना केवढी मानसिक क्रांति घडवावयाची होती हें यावरून ध्यानीं येईल.
 या क्रांतीचें जें तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलें त्याचें विवेचन येथवर केलें. आता संघशक्ति निर्माण करून त्यांनी ती प्रत्यक्षांत कशी घडविली याचा विचार करावयाचा आहे.