Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६८ । केसरीची त्रिमूर्ति

 अशा स्थितींत लोकांना नवी पाश्चात्त्य राजनीति शिकवून त्यांना जिवंत करणें, जुलमी राजसत्तेला प्रतिकार करण्याचें धैर्य त्यांच्या ठायीं निर्माण करणें, आणि वाटेल त्या यातना सोसून त्या सत्तेशी लढा करण्याची त्यांच्या मनाची तयारी करणें हें अवश्य होते. यालाच पुण्याच्या विठ्ठल मंदिरांतील एका व्याख्यानांत टिळकांनी 'खरें राजकीय नीतिशास्त्र' म्हटले आहे. ज्या शास्त्राचें पर्यवसान स्वराज्यांत होतें तें खरें राजकीय नीतिशास्त्र होय. (व्याख्यानें, पृ. २८६).
 स्वराज्याचें हें राजनीतिशास्त्र लोकमान्यांच्या व्याख्यानांवरूनच आता आपल्याला पाहवयाचें आहे.
प्रजाहि देवच
 राजसत्तेविषयी प्रजेच्या मनांत असणारा पूज्यभाव, आणि त्यांतूनच निर्माण होणारी भीति आणि धसका हा नष्ट करण्यासाठी "राजा देव असेल तर प्रजाहि देवच आहे,' असें टिळकांनी या व्याख्यानांत वारंवार सांगितलें आहे. ते म्हणतात, 'राजा देव आहे. हो आहे, नाही कोण म्हणतो? पण प्रजा कोण? देवच! अर्थात् प्रजा-देवाने राज-देवतेचा जुलूम सोसलाच पाहिजे, असें अनुमान यापासून निघत नाही. मनूने राजाला देवता म्हटलें आहे, पण त्यानेच त्याच्या पाठीमागे राजधर्म लावून देऊन, ते धर्म त्याने पाळले नाहीत तर तो नरकांत जाईल, असें स्पष्ट म्हटलें आहे. सारांश, राजा देव आहे असें म्हटलें तरी तेवढ्याने जुलमाचें आणि अन्यायाचें समर्थन होत नाही." (लो. टिळकांचीं व्याख्यानें, पू. ६, ७). सोलापूरच्या व्याख्यानांत त्यांनी असाच विचार सांगितला आहे. "राजा कांही आकाशांतून पृथ्वीवर पडलेला नाही. तो परस्परांच्या संमतीनेच निर्माण झाला पाहिजे. जो राजा आपल्या प्रजेच्या कल्याणाकरिता झटत नाही तो राजाच नव्हे व जी प्रजा आपले कर्तव्य बजावीत नाही ती प्रजाहि नव्हे. प्रजेने राजास कर्तव्य करावयास लावावें हीहि पूर्वापारची वहिवाट आहे."
 पूर्वीच्या शास्त्रांत राजाचे धर्म सांगितले आहेत, आणि ते न पाळले तर राजा पापी ठरतो, असेंहि म्हटलें आहे. पण 'प्रजाद्रोह' असा शब्द त्या शास्त्राने वापरलेला नाही. टिळकांनी तो शब्द वारंवार वापरला आहे. अकोला येथील व्याख्यानांत ते म्हणतात, "सध्यांच्या पीनल-कोडांत प्रजाद्रोहाला शिक्षा सांगितलेली नाही. तरी सर्व राजांचा राजा जो परमेश्वर त्याच्या कोडांत प्रजाद्रोहाबद्दल शिक्षा सांगितलेली असलीच पाहिजे. हा प्रजाद्रोहाचा गुन्हा राजांकडून होत असला म्हणजे प्रजेच्या मनोवृत्ति प्रज्वलित होऊन राजेलोक त्यांत पतंगाप्रमाणे नाश पावतात." (व्याख्यानें, पृ. २५६).
प्रतिकार
 राजा ही देवता असेल; पण ती भ्रष्ट झाली व तिने जर प्रजाद्रोह केला, तर तिचा प्रतिकार करण्याचा प्रजेला हक्क आहे; नव्हे तें तिचें कर्तव्यच आहे. तेव्हा