Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-३-

प्राचीन परंपरा


संजीवनी
 लो. टिळक हे प्राचीन परंपरेचे अतिशय अभिमानी होते. हिंदुस्थानची प्राचीन परंपरा अत्यंत उज्ज्वल असून, जगांतल्या इतर कोणत्याहि देशाच्या वा समाजांच्या परंपरेपेक्षा ती फार श्रेष्ठ होती, असें त्यांचें निश्चित मत होतें. आपल्या परंपरेच्या श्रेष्ठतेची जाणीव, तिचा सार्थ अभिमान, म्हणजे एकराष्ट्रीयत्वाची संजीवनीचं होय, असें त्यांना वाटत असे. त्या वेळी देश पारतंत्र्यांत होता, आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांची वैज्ञानिक पाश्चात्त्य संस्कृति ही तत्कालीन हिंदु संस्कृतीपेक्षा प्रत्येक बाबतींत श्रेष्ठ आहे, असें पावलोपावलीं प्रत्ययास येत होतें. यामुळे हिंदी जनतेचा आत्मविश्वास खचत चालला होता. तो तसा खचावा, आपण स्वराज्याला, स्वातंत्र्याला लायक नाही, असें वाटून हिंदी मनाला मरगळ यावी व पारतंत्र्याविरुद्ध झगडा करण्याची त्यांची शक्ति, त्यांची इच्छाच नष्ट व्हावी, असा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जाणूनबुजून प्रयत्न चालविला होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी या सांस्कृतिक आक्रमणाला कसें तोंड दिलें व महाराष्ट्रियांचा स्वाभिमान कसा जागृत केला, हें मागे आपण पाहिलेच आहे. लो. टिळकांनी त्यांचें तेंच कार्य दृढनिश्चयाने पुढे चालवून हिंदी जनतेंत चैतन्य निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न चालविला होता.
 पण यामुळेच, परंपरेच्या या अभिमानामुळेच लो. टिळकांना अनेकांनी प्रतिगामी, पुराणवादी, पुनरुज्जीवनवादी, सुधारणाविरोधी, कर्मठ सनातनी ठरविलें होतें, आणि आजहि त्यांच्या कार्याचें मूल्यमापन करतांना कांही पंडित या आरोपांचा पुनरुच्चार करतांना दिसतात. म्हणून टिळकांच्या या परंपराभिमानाचे स्वरूप काय होतें तें तपासून पाहणें आवश्यक ठरते.