Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाश्चात्त्य विद्या । २२५

ज्ञान हें सामर्थ्य
 जें ज्ञान टिळकांना अभिप्रेत होतें, जें खेड्यापाड्यांत पसरण्याचा त्यांचा आग्रह होता. ज्यामुळे जोम येतो, ज्यामुळे वृक्षाची पूर्ण वाढ होते, तें ज्ञान म्हणजे इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान येथल्या विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान होय. स्वराज्य- प्राप्तीसाठी त्या ज्ञानाचें साह्य त्यांना हवें होतें. सरकारी व सरकारमान्य शाळांत इतिहास, भूगोल, रसायन, पदार्थविज्ञान हेच विषय शिकवीत, पण ते निर्जीवपणे, ओशाळेपणे शिकवीत. लोकमान्यांना राष्ट्रीय शिक्षणांत विषय तेच शिकवावयाचे होते; पण त्या शिक्षणाने विद्यार्थ्यांची मनें त्यांना समर्थ करावयाची होती; इंग्रजी राज्यामुळे आमचें नुकसान होत आहे, हें त्यांना शिकवावयाचें होतें, त्या ज्ञानाच्या साह्याने लोकांची प्रतिकारशक्ति त्यांना जागृत करावयाची होती; स्वधर्म, स्वभाषा, भारतीय परंपरा यांचा अभिमान जागृत करावयाचा होता; आणि 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून मी ते मिळवीनच' ही ईर्षा विद्यार्थ्यांच्या मनांत निर्माण करावयाची होती. म्हणून इंग्लंड, अमेरिकेत जी विद्या मुलांना देतात ती त्यांना येथल्या मुलांना द्यावयाची होती. त्या विद्येत खरें सामर्थ्य आहे हें त्यांनी जाणलें होतें.
प्रत्यक्षनिष्ठ शास्त्रे
 वर जीं पाश्चात्त्य शास्त्रे सांगितलीं तीं प्रत्यक्षनिष्ठ व प्रयोगक्षम आहेत. तीं दृष्टफल आहेत, धर्मशास्त्राप्रमाणे अदृष्टफल नाहीत. तेव्हा त्यांचा विचार करतांना आपण प्रत्यक्षाला प्रयोगजन्य निर्णयाला, दृक्प्रत्ययालाच महत्त्व दिलें पाहिजे, त्या बाबतींत वेदांचा किंवा पूर्वाचार्याचा आधार घेऊन दृक्प्रत्यय खोटा, असें मानणें केव्हाहि योग्य नाही, असें लोकमान्य टिळकांनी अनेक वेळा आवर्जून सांगितलें आहे. "पाश्चात्त्य राष्ट्रे अद्याप जिवंत आहेत, आणि तीं आपल्या शास्त्रांची वाढ करण्याच्या उद्योगांत सतत मग्न असतात. प्राचीन काळी आमचे आचार्य असाच उद्योग करीत असत; पण पुढे ही वृत्ति सुटली व आमच्या शास्त्रांची वाढ खुंटली.' टिळक म्हणतात, "ख्रिस्ती शकानंतर कांही शतकांनी शास्त्रविद्येचा जिवंतपणा कमी होऊं लागला, आणि आमचे पंडित पूर्वाचार्यांनी केलेले सिद्धान्तच खलीत बसण्याच्या उद्योगास लागले. हिंदुस्थानांतील शास्त्रांची ही स्थिति सदर शास्त्रे युरोपियन पंडितांच्या हातांत पडल्यावर पालटली." (लो. टिळकांचे केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. ४८५, ४८६). आता आपल्या शास्त्रांना जिवंतपणा यावयास हवा असेल तर आपण प्रत्यक्षनिष्ठ झालें पाहिजे, असें टिळकांनी पुनः पुन्हा बजाविलें आहे.
ब्रह्मवाक्यहि अप्रमाण
 पंचांग-संशोधनाच्या बाबतींत त्यांची ही विज्ञाननिष्ठा अनेक वेळा प्रत्ययास आलेली आहे. १९ मे १९०० च्या केसरींतील लेखांत त्यांनी म्हटले आहे की, "केरूनाना, दीक्षित ह्यांच्यांवर आधुनिक यवनाचार्य म्हणजे युरोपीय ज्योतिर्गणिती यांच्या संशोधनाचा परिणाम झालेला आहे. स्वतः वेध घेऊन त्याप्रमाणे जुनें शास्त्र सुधारलें
 के. त्रि. १५