Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२४ । केसरीची त्रिमूर्ति

सुशिक्षित शत्रु
 राष्ट्रीय पक्षाच्या चळवळीवर टीका करतांना मोर्लेसाहेब म्हणत की, "हिंदुस्थानांतले सुशिक्षित लोक हे इंग्रजी राज्याचे खरे शत्रु आहेत." त्याला उत्तर देतांना टिळक म्हणत की, "आम्ही सुशिक्षित लोक त्यांचे शत्रु कां झालों? तर आम्हांला मिळालेल्या शिक्षणामुळे. म्हणजे आम्ही त्यांचे शत्रु नसून, आमचें ज्ञान हें त्यांचे शत्रु आहे." (उक्त ग्रंथ, पृ. ३). हाच विचार त्यांनी पुण्याला गायकवाडवाड्यांत झालेल्या व्याख्यानांत त्याच साली पुन्हा मांडला आहे. "सरकार म्हणतें शिकलेले लोक आमचे शत्रु आहेत. रयत अजून आमच्या नादी आहे. त्यांना तसेंच ठेवण्याचा आमचा उद्योग आहे, पण सुशिक्षित म्हणतात, तें आम्ही कधीहि होऊं देणार नाही." जे ज्ञान शाळा-कॉलेजांत, विद्यापीठांत सुशिक्षितांना मिळालें तें सर्वं रयतेंत पसरणें व रयतेलाहि इंग्रजांचे शत्रु बनविणें, हा उद्योग टिळकांनी जन्मभर केला. सर्व सुशिक्षितांनी रामदासी बनून तेंच कार्य करावे अशी त्यांची शिकवण होती. कारण या ज्ञानाच्या साह्यानेच राष्ट्र घडावयाचें आहे अशी त्यांची निश्चिति होती.
 गणपतीपुढे व्याख्यान असलें की, न चुकतां लोकमान्य सांगत की, "गणपति ही ज्ञानाची देवता आहे, आज मला तिची मदत पाहिजे आहे." गणपति उत्सव कशासाठी आहे? "ज्ञान मिळावें म्हणून ही सारी खटपट आहे. आम्हांला धर्मदृष्टया सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या, वळण पाहिजे आहे. केवळ मौज करण्याकरिता आम्ही हा उत्सव करीत नाही. तुम्ही जिवंत रहावयाला योग्य आहा की नाही हें निश्चयाने दाखवावयाचें आहे." (उक्त ग्रंथ, पृ. ४५, ५०).
अमेरिकेसारखे शिक्षण
 हें ज्ञान म्हणजे कोणतें ज्ञान? अर्थातच पाश्चात्य विद्यांचें ज्ञान. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय, तें स्पष्ट करतांना त्यांनी हें अनेक वेळा सांगितलें आहे. "राष्ट्रीय शिक्षणांत आम्हांला मराठीत शिक्षण पाहिजे. त्यांत व्यापारी व शास्त्रीय विषयांचें शिक्षण पाहिजे हें खरें; पण मुख्य मुद्दा हा नाही. इंग्लंड, अमेरिका यांसारख्या स्वतंत्र देशांत जें शिक्षण देतात तसलें शिक्षण आम्हांला पाहिजे आहे. आम्हांला जोमाचीं माणसें पाहिजे आहेत. तीं सरकारला कदाचित् पटावयाची नाहीत, पण त्याला कांही इलाज नाही. कुंडीतल्या झाडाप्रमाणे ठराविक उंचीपर्यंत झाड वाढू देण्याची सरकारची इच्छा आहे. आम्हांला पूर्ण वाढ होऊं द्यावयाची आहे. आम्हांला स्वराज्याचे शिक्षण पाहिजे आहे. सरकारला ओशाळलेला शिक्षकवर्ग या कामाचा नाही." (व्याख्यानें, पृ. २४). "इंग्लंडने ज्याप्रकारच्या संस्था काढून आपली स्थिति सुधारली तशा प्रकारच्या संस्था काढून आपण आपली स्थिति सुधारून घेतली पाहिजे. जपानने चाळीस वर्षांत जे केलें तें इंग्रजांनी दीडशे वर्षांत हिंदुस्थानांत केलें नाही. आपलें शिक्षण अपुरें आहे, तें पुरें करण्याचा यत्न तुम्ही कराल, अशी मी आशा करतों." (व्याख्यानें, पृ. ७०).