Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-२-

पाश्चात्त्य विद्या


 हिंदुस्थानांतील शतधा विघटित अशा हिंदी समाजांतून एक राष्ट्र निर्माण करावयाचें हें अभूतपूर्व उद्दिष्ट टिळकांनी कसें साध्य केलें?
 पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांच्या साह्याने!
 लो. टिळक हे सनातन धर्माचे अभिमानी होते; प्राचीन परंपरेचाहि त्यांना फार अभिमान होता; सुधारकांवर त्यांनी फार प्रखर टीका केली होती; असें असतांना त्यांनी पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांचा आश्रय केला, त्यांचा अवलंब करून हिंदुस्थानांत राष्ट्र-निर्मिति केली, हें वाचून अनेकांना विस्मय वाटेल, आश्चर्य वाटेल. पुष्कळांना हें विधान रुचणार नाही, पटणार नाही; पण तें खरें आहे. तें अगदी पूर्ण सत्य आहे. त्या विद्येवांचून त्यांना आपले उद्दिष्ट साध्य करतां आलेच नसतें. त्या संस्कृतीच्या आश्रयावांचून त्यांना एक पाऊलहि पुढे टाकतां आलें नसतें. लोकमान्यांना स्वतःलाहि ही पूर्ण जाणीव होती.
 पाश्चात्त्य शास्त्र
 १९०७ साली बेळगावला 'सरकारी शिक्षण व राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर बोलतांना ते म्हणाले, "तरुण पिढीने विद्वान्, बुद्धिमान् निश्चयी व शरीर- सामर्थ्याने युक्त व्हावे, इतकीच आमची इच्छा नाही. तर आमच्या तरुणांनी पाश्चात्त्य शास्त्रांत पारंगत व्हावें, अशीहि आमची प्रबल इच्छा आहे. हीं पाश्चात्त्य शास्त्र आमच्या विद्यार्थ्यांस शिकविण्याच्या कामी ज्या दिवशी हरकत होईल त्या दिवशीं हिंदुस्थानचा भाग्योदय सरला असें मी समजेन." (लोकमान्य टिळकांची व्याख्यानें, पृ. ९३). पाश्चात्त्य शास्त्रांचें लोकमान्य किती महत्त्व मानीत होते, तें यांवरून ध्यानांत येईल.