Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२० । केसरीची त्रिमूर्ति

कधीच स्वीकारले नाही. त्यामुळे अर्वाचीन युगांत शेतकरी हाच राष्ट्राचा आत्मा होय हें सत्य तें जाणूं शकले आणि भारतांत तें दृढमूल करूं शकले.
 पण शेतकरी हा राष्ट्राचा कणा होय असें त्यांचें मत होतें म्हणून गिरणी- कारखान्यांत काम करणारा जो कामगारवर्ग त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलें किंवा त्याला हीन मानलें असें नाही. १९०२-३ सालापासून त्यांनी त्या वर्गांतहि आपले कार्यकर्ते पाठवून कामगारांत राष्ट्रीय जागृति करण्यास प्रारंभ केला होता. १९०८ खाली त्यांना शिक्षा झाली त्या वेळी मुंबईचे कामगार खवळून उठले व सरकारी अत्याचारांना न जुमानतां त्यांनी सहा दिवस संप चालू ठेवला तो टिळकांना ते राष्ट्रपुरुष मानीत होते म्हणूनच होय. तेव्हा शेतकरी आणि कामकरी यांच्यांत टिळक भेद करीत नव्हते, हें स्पष्ट आहे. प्रारंभापासून भारत म्हणजे सर्व कष्टकरी जनता असेंच समीकरण त्यांनी मनाशी निश्चित केलें होतें.
समन्वय
 आणि केवळ शेतकऱ्यांच्या किंवा कामकऱ्यांच्या बाबतींतच नव्हे, तर सर्वच दृष्टींनी त्यांनी वर्गविग्रहाचें तत्त्व त्याज्य ठरवून टाकलें होतें. त्यांना या विस्कळित, विघटित, भेदजर्जर, जाति, पंथ, धर्म, जमाती यांनी शतशः विभागलेल्या हिंदी समाजांतून एक राष्ट्र निर्माण करावयाचें होतें. म्हणून त्यांनी धर्मसमन्वयाचें, जातिसमन्वयाचें आणि त्याचप्रमाणे वर्गसमन्वयाचें धोरणच अंगीकारलेलें होतें. अमका धर्म, अमको जात, अमका वर्ग जास्त राष्ट्रवादी आणि अमका कमी, असा मुळांतच कांही भेद आहे, असे त्यांनी कधीहि मानले नाही. पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याशी बोलतांना एकदा त्यांनी, संगीताच्या भाषेंत, आपलें राष्ट्रीयत्वाचें तत्त्वज्ञान स्पष्ट करून सांगितले होते. ते म्हणाले, "तुमच्या गाण्याच्या विषयांत ऐक्याचा धडा अवश्य शिकण्यासारखा आहे. कसा तो पहा- तंबुरा, सतार, सारंगी, दिलरुबा, बीन, रुद्रवीणा, ताऊस, फिड्ल, तबला, मृदंग, हार्मोनियम हीं निरनिराळ्या स्वरूपाचीं वाद्ये आहेत. तीं वाजविण्याच्या तऱ्हाहि निरनिराळ्या व वाजविणारी माणसेंहि निरनिराळी असतात; परंतु निरनिराळीं वाद्यें, तीं वाजविणाऱ्यांच्या मनांत एकच ध्येय असल्यामुळे, परस्परांना उपकारकच होतात. उलट एकाच जातीचीं वाद्ये असून सुद्धा वाजविणाऱ्यांच्या मनांत ऐक्य नसेल तर, तींच अनुपकारकहि होतील. यावरून धर्मभेद, जातिभेद, पक्षभेद, पंथभेद असले तरी ध्येय एकच ठेविलें तर खरोखर कोणतीहि अडचण येणार नाही. निरनिराळ्या रस्त्यांनी एकाच गावाला जातां येतें; पण गाव गाठण्याचें ध्येय नसून एकमेकांचे रस्ते अडविण्याचे किंवा मोडून टाकण्याचे ध्येयच धरल्यामुळे, कोणालाहि पुढे जातां येत नाही. तरी आपले कर्तव्य समजून, फलाविषयी निरिच्छ राहून, मार्ग क्रमीत असलें पाहिजे. म्हणून म्हणतों, अशा कर्तव्यबुद्धीने तुमचा तंबुरा छेडला जाऊं दे!" (आठवणी, खंड २ रा, पृ. २७१.)