Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्व-राज्यांतील 'स्व'चा व्याप । २१७

काय आहे, याची लोकसमूहाला जाणीव करून द्यावी. सरकार करीत असलेल्या जुलमाची त्यांना आठवण करून द्यावी व सर्वांत धर्म-बुद्धि जागृत करून राष्ट्रीयत्वास बळकटी आणावी.
रामदासी संप्रदाय
 डॉ. भडकमकर यांच्यांशी बोलतांना एकदा लोकमान्य म्हणाले, "काँग्रेसच्या चळवळीकडे खेड्यापाड्यांतील लोकांचेंहि लक्ष वेधून, पुढाऱ्यांना खऱ्या लोकांचा पाठिंबा मिळावा, अशा तऱ्हेचे प्रयत्न मी अगदी प्रारंभापासून करीत आहे; तरी पण आपली सर्व चळवळ अद्याप बुद्धिमान् वर्गांतच चालली आहे... ह्या सर्व चळवळी आता धार्मिक व औद्योगिक प्रश्नांच्या पायांवर उभारून खालवर कोना—कोपऱ्यांत पसरविल्या पाहिजेत. या कामाकरिता स्वार्थत्यागी, अल्पसंतुष्ट, उद्योगी, गरीब माणसें उपदेशक म्हणून तयार करून त्यांस वक्तृत्व, वैद्यकी, ज्योतिष, थोडें-बहुत धर्मशास्त्र इत्यादि लोकोपयोगी कला शिकवून, खेड्यांतून रहावयास पाठवून, राजकीय रामदासी संप्रदाय वाढविला पाहिजे... हे लोक समाजांत ठिकठिकाणीं पसरून लोकांच्या सुखदुःखाशी समरस होऊन वावरूं लागले म्हणजे लोकांची मनें आकर्षित करूं शकतात... आणि मग चळवळ अंतःस्फूर्तीने उत्पन्न झाल्यासारखी होऊन तिला जिवंतपणा प्राप्त होईल." (आठवणी, खंड २ रा, पृ. २५५.)
 कलकत्त्याला लोकमान्यांचें 'स्वराज्य' या विषयावर व्याख्यान झालें. त्या वेळीं, "मला होमरूलच्या खटपटीसाठी प्रत्येकी रुपया, आठ आणे देणारींच हजारो माणसें पाहिजेत", असें त्यांनी सांगितलें. कलकत्त्याला लोकमान्यांचे आदरातिथ्य सर्व कोट्याधीश मारवाडी लोकांनी केलें होतें. त्यांना ही मागणी ऐकून मोठा विस्मय वाटला. ते लोकमान्यांना म्हणाले, "तुम्हांला फंडाची जरूर असेल तर आम्हांला गुप्त इशारा द्या. आम्ही तुम्हांला लाखो रुपये मध्यरात्रीं आणून देऊ. असे प्रत्येक माणशी आठ आणे, रुपया कशाला मागता?" त्यावर लोकमान्य म्हणाले, "तूर्त जी होमरूलची खटपट आम्हांला करावयाची आहे तिला 'स्वराज्य पाहिजे' म्हणणारी व स्वराज्याच्या खटपटीला प्रत्येकी आठ आणे, रुपया देणारी माणसें मिळाली तरी पुरे." 'स्वराज्य'मधील 'स्व'चा लोकमान्यांच्या मनांत काय अर्थ होता तें यावरून स्पष्ट होईल. आठ आणे, रुपया देणारी हजारो माणसें, स्वराज्य पाहिजे म्हणणारी लाखो माणसें- यांचे राज्य म्हणजे स्वराज्य! (आठवणी, खंड २रा, पु. ४६४.)
 चाळीस वर्षे लोकमान्य हिंदी लोकांना 'स्व'चा हा अर्थ समजावून देत होते. हिंदुस्थानचे 'स्व' म्हणजे कोण? शेतकरी, कुंभार, सुतार, लोहार, कोष्टी हे कारागीर, वारली, कोळी, कारखान्यांतील कामगार, भिल्ल, कातकरी, तेली, तांबोळी हे लोक म्हणजे 'स्व'. मूठभर सुशिक्षित म्हणजे 'स्व' नव्हे. कोट्याधीश मारवाडी, संस्थानिक, राजे, सरदार हे तर नव्हेच नव्हे.