Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१४ । केसरीची त्रिमूर्ति

राजद्रोह होता; पण आता, अंतिम उद्दिष्ट म्हणून का होईना, सरकारने तें मान्य केलें. टिळकांच्या चळवळीचा हा मोठाच विजय होता.
 १९१८ साली टिळक होमरूलचे शिष्टमंडळ घेऊन विलायतेस गेले. टाइम्सचा वार्ताहर चिरोल याच्यावर अब्रूनुकसानीची फिर्याद लावणें हाहि एक हेतु तेथे जाण्यांत होता. चिरोलच्या खटल्याचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेला. शिष्टमंडळाचें काम मात्र कांही स्वरूपांत साधलें. तेथील मजूर पुढाऱ्यांची सहानुभूति हिंदुस्थानच्या स्वराज्याच्या चळवळीला लाभली. हीं दोन्ही कामें संपवून टिळक १९१९ सालअखेर हिंदुस्थानांत परत आले. चिरोलप्रकरणी टिळकांचा अडीच-तीन लाख रुपये खर्च झाला होता. तो खर्च टिळक परत आल्यावर ग्रंथ लिहून त्यावर पैसे मिळवून भरून काढणार होते; पण ते येथे पोचण्याच्या आधीच लोकांनी स्वयंस्फूर्तीने तीन लाख रुपये फंड जमवून तो प्रश्न सोडवून टाकला होता.
 टिळक विलायतेंत असतांनाच हिंदुस्थान सरकारने रौलेट बिलें पास करून दडपशाहीचा वरवंटा फिरविण्यास प्रारंभ केला होता. त्याच्या निषेधार्थं महात्माजींनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. तिच्यांतूनच 'जालियनवाला बाग' हें हत्याकांड उद्भवलें. या वेळी चळवळ अगदी अपूर्व अशी झाली, व आपण नसतांना एवढी चळवळ झालेली पाहून टिळकांना फार समाधान वाटलें.
 १९१९ च्या डिसेंबरअखेर अमृतसरला काँग्रेसचें अधिवेशन झालें. त्या वेळी 'माँटेग्यूसाहेबांनी दिलेल्या सुधारणा निराशाजनक व असमाधानकारक आहेत' या ठरावांतील शब्दांविषयी फार वाद झाला; पण अखेरीस टिळकांचे म्हणणे मान्य होऊन काँग्रेसचें ऐक्य अभंग राहिलें. या अधिवेशनास टिळक गेले तेव्हा त्यांचा अमृतसरला अपूर्व सन्मान झाला. "हिंदुस्थानांत राष्ट्रीय भावनांचा प्रसार करणाऱ्या आदिपुरुषांत टिळकमहाराजांची गणना प्रमुख स्थानों केली जाते" असे उद्गार स्वामी श्रद्धानंदजी यांनी काढले.
 लोकमान्यांनी जन्मभर केलेल्या कार्याची भारताने त्यांना ही जणू पावतीच दिली!
 ही पावती मिळतांच टिळकांचे जीवितकार्य संपल्यासारखें झालें. "माझ्या सर्व शक्ति क्षीण होत चालल्या आहेत," असें ते अलीकडे म्हणतच असत. महात्माजींचा उदय झाल्यामुळे, आपल्या कार्याचा वारसा चालविणारा नेता भारताला मिळाला आहे, हा दिलासाहि त्यांना मिळाला होता. त्यामुळेच कृतार्थता वाटून त्यांनी आपली जीवितयात्रा संपविली. ३१ जुलै १९२० च्या उत्तररात्री ते अनंतांत विलीन झाले.