Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१२ । केसरीची त्रिमूर्ति

राजीनामा दिल्यावर केसरी व मराठा ह्या वृत्तपत्रांच्या कामालाच त्यांनी सर्वस्वीं वाहून घेतलें.
 १८८२ साली कोल्हापूर- प्रकरण झालें. कोल्हापूर संस्थानचे कारभारी श्री. बर्वे हे महाराजांचा छळ करतात, असा मजकूर केसरींत आला. त्यामुळे त्यांनी बदनामीची फिर्याद केली. तींत आरोप सिद्ध न झाल्यामुळे टिळक व आगरकर ह्यांना जुलै महिन्यांत १०१ दिवसांची शिक्षा झाली. ते दोघे संपादक डोंगरीच्या तुरुंगांत होते. ऑक्टोबरमध्ये सुटका होऊन ते परत वृत्तपत्रांचें काम पाहूं लागले.
 विष्णुशास्त्री यांच्याप्रमाणेच स्वधर्म, स्वभाषा व स्वदेश यांच्या अभिमानांतूनच टिळकांनाहि कार्याची प्रेरणा मिळाली होती; आणि पारतंत्र्य हा नरक असून, तें नष्ट करण्यासाठी व स्वदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवित अर्पण करावयाचें हा त्यांचा ध्येयवाद प्रारंभींच निश्चित झाला होता. केसरी व मराठा या पत्रांतून त्यांनी लेखन केलें तें या ध्येयाच्या सिद्धीसाठीच केलें.
 १८९० सालापासून त्यांनी इंग्रजी राज्यकारभारावर प्रखर टीका करण्यास प्रारंभ केला. हळूहळू ते लेख उग्र होऊं लागले. या लेखी टीकेला पुढे त्यांनी गणपति-उत्सव व शिवाजी-उत्सव यांची जोड दिली. १८९४ साली गणपति उत्सव सुरू झाला. त्याला १८९६ सालीं राट्रीय रूप आलें. त्याच साली शिवाजी-उत्सवहि सुरू झाला. पहिला उत्सव रायगडावर झाला व मग हळूहळू तो महाराष्ट्रभर आणि बाहेरहि पसरला. १९०५ सालीं तर जपानांतहि शिवाजी-उत्सव झाला.
 हे दोन्ही उत्सव राष्ट्रजागृतीसाठीच होते. इंग्रज सरकारविरुद्ध असंतोष पसरविणें हाच त्यांचा हेतु होता. या जत्रा- उत्सवांतून सुशिक्षित लोकांनी खेड्यापाड्यांत जाऊन सरकार करीत असलेल्या जुलमाची लोकांना जाणीव करून द्यावी, असा उपदेश टिळक नित्य करीत असत. १८९६ सालच्या दुष्काळांत त्यांनी आणखी एका मार्गाने हेंच जागृतीचे कार्य सुरू केलें. तो मार्ग म्हणजे साराबंदीची चळवळ हा होय. यामुळेच त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप येऊन १८९७ च्या सप्टेंबरमध्ये त्यांना १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली; पण पुढे थोड्या दिवसांनी राजकीय वातावरण निवळलें. मॅक्समुल्लरसारख्या पंडिताने इंग्लंडमध्ये कांही खटपट केली; यामुळे शिक्षा कमी होऊन टिळक सहा महिने आधीच सुटले.
 १८९८ ते १९०८ हा दहा वर्षांचा काळ म्हणजे टिळकांच्या राजकीय कर्तृत्वाचा मध्यान्हकाळ होय. ते या काळांतच 'हिंदी असंतोषाचे जनक' झाले. या काळांतच 'स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य' ही राष्ट्रीय चळवळीची चतुःसूत्री त्यांनी सांगितली. ते अखिल भारताचे नेते झाले, ते याच काळांत. १९०८ सालची शिक्षा त्यांनी अत्यंत धैर्याने व स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. तेव्हा त्रिखंडांत त्यांची कीर्ति होऊन मानवी इतिहासांत महापुरुष म्हणून त्यांची गणना होऊं लागली. ते नामदार टिळक होते ते लोकमान्य टिळक झाले ते याच काळांत.