Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राचीन परंपरेचा अभिमान । १९९

वेदांतील पुरावा
 वेद हे हिंदूंचे आद्य ग्रंथ आहेत आणि ते सर्वांत प्राचीन ग्रंथ आहेत याविषयी जगांतील पंडितांचे एकमत आहे. वेदांतील ऋचा म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य इत्यादि देव यांच्या प्रार्थना आहेत. त्या प्रार्थना ज्या आर्यलोकांनी केल्या आहेत, त्यांना अनेक वस्तूंचे धर्म समजलेले असावे, ते वन्यावस्थेंतून वर येऊन त्यांच्यांत समाज-व्यवस्था उत्पन्न झालेली असावी, त्यांना राज्यधर्म, माहीत झालेला असावा, असें अनुमान करतां येतें. पंडितकृत वेदार्थयत्नांत, वेदांत निरनिराळ्या वस्तूंचे व कलांचें जे उल्लेख आहेत त्यांची जंत्री दिली आहे. त्यावरून त्या काळी आर्य लोकांना सोनें, रूपें, लोखंड इत्यादि धातूंचा उपयोग माहीत होता, शेती व पशुपालन हे उद्योग ते करीत होते, धनुष्यबाण, खड्ग, रथ वापरीत होते, घरें, शहरें व किल्ले बांधीत होते, असें दिसून येतें. यावरून असें सिद्ध होतें की, या सर्व कला येथे अत्यंत प्राचीन काळी उदय पावल्या आणि विकसित झाल्या होत्या.
बाह्य पुरावा
 भारताच्या प्राचीन संस्कृतीविषयी परकीय संशोधकांनी पुष्कळ लिहून. ठेवलेले आहे. 'फ्लारिडा' व 'पेरिप्लस' या ग्रंथांत भारताच्या व्यापाराविषयी बरीच माहिती मिळते. मिरी, दालचिनी, नीळ, केशर, हळद, कापूर, हस्तिदंत या पदार्थांप्रमाणेच सोन्यारुप्याचे दागिने, रेशमी कापड, मलमल, साखर; साग, शिसवी, शिंगें, वगैरेंचें कोरीव सामान; काचेचीं भांडीं, सोन्यारुप्याची तबकें इत्यादि वस्तूहि भारतांतून परदेशी जात होत्या. इ. स. पूर्वी अनेक शतकें असा व्यापार चालत होता, असें त्या ग्रंथांवरून कळते. यावरून प्राचीन काळीं पुष्कळ उच्च दर्जाची संस्कृति भारतांत नांदत होती, हें सिद्ध होतें.<br?हिंदु स्त्रीचें चरित्र्य
 स्वधर्म व प्राचीन भारतीय परंपरा यांबद्दल आगरकरांना जसा अभिमान होता, तसाच हिंदु स्त्रीच्या चारित्र्याविषयी त्यांना फार आदर होता. त्यावर कोणीं कुत्सित टीका केलेली त्यांना मुळीच खपत नसे. अशबरनर नामक एका इंग्लिश गृहस्थाने नॅशनल रिव्हयूमधील आपल्या लेखांत हिंदु विधवांबद्दल अत्यंत अशिष्ट विधाने केलेली जेव्हा त्यांनी वाचली तेव्हा ते फारच संतापले. मात्र त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने संयमपूर्वक लेख लिहून त्या आरोपाचे खंडन केलें आहे. अशबरनरने लिहिलें होतें की, "हिंदु विधवांस वाटेल तसा आनाचार करण्यास हिंदु समाजाने पूर्ण सनद दिली आहे. तिच्या पापाचरणाकडे समाज जाणूनबुजून दुर्लक्ष करितो." या आरोपांत मुळीच तथ्य नाही; कारण कर्नल मनरोसारख्या गृहस्थांनी हिंदु स्त्रियांचें शुद्ध आचरण आदर्शवत मानले आहे, असें आगरकरांनी दाखवून दिलें आहे.