Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९८ । केसरीची त्रिमूर्ति

 कलांच्या अभिवृद्धीसाठी कोणत्याहि देशांत समृद्धि असावी लागते. अन्नधान्य, वस्त्रप्रावरण यांची विपुलता असते तेव्हाच कलावंतांना चरितार्थासाठी फार कष्ट वा चिंता करावी लागत नाही; आणि कलाकुसरीचीं कामें करायला वेळ व स्वस्थपणा मिळू शकतो. भारतांत प्राचीन काळी सर्व प्रकारची समृद्धि नांदत होती. हिमालय, विंध्य, सह्य वगैरे पर्वतांवर घनदाट अरण्ये असून, त्यांत नाना प्रकारचे वृक्ष होते, शेकडो जातींचे पशुपक्षी होते; सर्वत्र सुपीक जमीन असून खंडोगणती धान्य पिकत होतें; येथे खनिज संपत्ति भरपूर होती. एकंदरींत कशाची कमतरता नसल्यामुळे या देशांतील लोकांना कलेचा विकास करण्यासाठी अवश्य असणारें स्वास्थ्य लाभत होतें.
 या समृद्धीमुळे हिंदुस्थानांत विविध प्रकारच्या कला पूर्वी विकसित झाल्या होत्या, हें अनेक प्रमाणांनी सिद्ध करून दाखवतां येतें. मनुस्मृति हा ग्रंथ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा असून, त्यांत अनेक कलांचा व कारागिरांचा उल्लेख आहे. त्यांचे सविस्तर वर्णन त्या ग्रंथांत नसले, तरी त्या काळीं त्या कला विकसित झालेल्या असल्या पाहिजेत, हें उघड आहे. देवालयें, हौद, विहिरी, प्रासाद, दुर्ग, इत्यादि बांधण्याचे शास्त्र हिंदु लोकांना ज्ञात होतें.; लोकर, कापूस, ताग, रेशीम यांपासून वस्त्रे विणून तो रंगविण्याची कला त्यांना अवगत होती; सोन्यारुप्याचे दागिने घडविण्यांत ते कुशल होते. लोखंड, तांबें, पाषाण, हस्तिदंत यांचीं पात्रे वा सुबक वस्तु ते बनवीत होते; नाणी तयार करीत होते, आणि विविध प्रकारच्या वस्तूंचा परदेशांशी मोठा व्यापार चालू होता, असें मनुस्मृतीवरून कळतें. तोपर्यंत भारतांत ग्रीक लोक येऊन स्थायिक झाले नव्हते; आणि मुसलमान तर त्यानंतर शेकडो वर्षांनी आले. तेव्हा आज ज्या कला येथे आढळतात त्यांची अभिवृद्धि फार प्राचीन काळी झालेली आहे; तिचा ग्रीक वा मुसलमान लोकांशी कांही संबंध नाही. रामायण च महाभारत या ग्रंथांतहि असे अनेक उल्लेख आढळतात. सर जॉर्ज बर्डवूड यांनी रामायणाच्या आधारे हिंदुस्थानच्या कलांच्या पुराणत्वाचें मंडन केलें आहे. भरत रामाला भेटण्यासाठी निघाला, त्या वेळीं अयोध्येंतील लोकहि त्याच्याबरोबर निघाले. त्यांत सर्व प्रकारचे कारागीर होते, असें वर्णन रामायणांत आहे. यावरून त्या काळी त्या कला विकसित झालेल्या होत्या, यांत कांही शंका नाही. ग्रीक लोक हिंदुस्थानांत कायमचे राहिले नव्हते; पण त्यांच्याशीं भारतीय लोकांचें दळणवळण मात्र चालू होतें. तेवढ्यावरून हिंदु लोकांनी ग्रीकांकडून सगळी कारागिरी घेतली, असें म्हणतां येत नाही. उलट येथील कलाकुसरीच्या वस्तु परदेशांत जात होत्या व त्यांचे तिकडे कौतुक होत असे, असेंच त्यावरून म्हणावें लागेल. मुसलमान लोक इथे येऊन स्थायिक झाले, व त्यांनी येथे राज्य केलें हें खरें पण ते संस्कृतीने श्रेष्ठ, नव्हते; त्यामुळे त्यांचा प्रभाव पडणें शक्य नव्हते; आणि ते येण्यापूर्वीच आमच्या कला विकसित झालेल्या होत्या.