Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रातील अपेक्षित सुधारणा । १९५

लोकांना जागे करून, उद्योगास प्रवृत्त करावें, स्वतःच्या पायावर उभे राहून दारिद्र्य नष्ट करण्याचा मार्ग दाखवावा हाच त्यांच्या लेखनाचा हेतु होता.
 स्वावलंबनाचा मार्ग दाखवतांना आगरकरांनी आपल्या लोकांच्या नादानपणावरहि ताशेरे झाडले आहेत. आम्ही दुबळे, नालायक म्हणून आमचें राज्य गेलें व त्यामुळेच आमचा व्यापार बुडाला, उद्योगधंदे बंद झाले आणि दारिद्र्य कपाळीं आलें. इंग्रज लोक आपण होऊन सुखासुखी त्यांचे कारखाने आमच्या ताब्यांत देणार नाहीत. धमक असेल तर ते आपण आपल्या कर्तबगारीने काबीज केले पाहिजेत; पण आम्ही पंगु, अडाणी व आळशी असल्यामुळे तें कठीण आहे. इंग्रज लोक उद्योगप्रिय आहेत, कारण त्यांना सुखोपभोगाची आवड आहे; आणि त्यासाठी नाना प्रकारच्या वस्तु निर्माण करण्याची बुद्धि आहे; पण आम्हांला हजारो वर्षे वैराग्याची शिकवण मिळालेली असल्यामुळे सुखोपभोगाची फारशी आवड नाही, व त्यासाठी उद्योग करण्याची इच्छा नाही. आम्ही अल्पसंतुष्ट आहों. हा अल्पसंतुष्टपणा सोडल्याशिवाय आम्हांला मोठमोठे उद्योग करतां येणार नाहीत. देशासाठी कष्ट करण्याची व नुकसान सोसण्याची ईर्षा बाळगून मोठे यांत्रिक कारखाने काढले पाहिजेत, व खंडोगणती माल उत्पन्न केला पाहिजे, असें त्यांनी म्हटलें आहे.
 आता मोठाले उद्योग व कारखाने सुरू करावयाचे म्हणजे मोठे भांडवल हवें. त्याचा तर आमच्याकडे अभाव! तें उभारण्यासाठी लोकांनी आपला सोन्याचा हव्यास कमी करावा; दागदागिने, लग्नसमारंभ यांवरील खर्च कमी करावा; ज्यांच्याजवळ थोडाबहुत पैसा शिल्लक असेल त्यांनी तो बँकेत न ठेवतां थोडेसें धाडस करून उद्योगधंदेवाल्यांना द्यावा; मग भांडवल निश्चित जमेल, असें आगरकरांनी म्हटले आहे.
 शेवटी आगरकरांनी पुढील वाक्यांत वरील सर्व कहाणीचें सार सांगितलें आहे- आमच्या अंगीं देशाभिमान असता; आम्ही धर्मवेडाने वेडावून जाऊन आपापसांत तंटे करीत नसतो; परशत्रूला तोंड देण्यासारखी आम्हांत जूट असती; राष्ट्रहितासाठी स्वहितत्याग करण्याची आवड आम्हांस असती; आम्हांस आमचें राज्य चालविण्याची अक्कल असती; आणि कोणत्याहि प्रकारच्या संकटास न डगणारें धैर्य आमच्या अंगी असतें, तर मुसलमान तरी येथे कशाला येते! आणि इंग्रज तरी कशाला येते! तेव्हा रडत न बसता राज्यकर्तृत्वाचे गुण संपादन करणे हाच श्रेष्ठ उपाय होय, असा उपदेश त्यांनी केला आहे.
 समाजसुधारणांची मुळें ज्याप्रमाणे धर्मशास्त्रांत गुंतलेली होतीं त्याचप्रमाण आर्थिक सुधारणांची मुळे पारतंत्र्यांत, सत्ताधाऱ्यांच्या राजनीतिशास्त्रांत गुंतलेलीं होती. त्यामुळे आगरकरांनी आर्थिक व राजकीय सुधारणांचा विचार बहुधा एकत्रच केलेला आहे. त्यामुळे त्यासंबंधीचे विवेचनहि येथे एकत्र केलेले आहे.