Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १९३

पणें त्यांनी तें कसें तरी भरून काढावें असें ब्रिटिश सरकार म्हणते. दारूचें व्यसन कितीहि वाईट असले तरी, तिच्या खपावर आळा घालून स्वतःचें नुकसान करून घ्यायला मात्र तें सरकार तयार नाही. पण सुदैवाने अफूचा व्यापार बंद करण्याविषयी जो ठराव पार्लमेंटमध्ये मांडण्यांत आला होता, त्याला ग्लॅडस्टनने विरोध केल्यामुळे तो रद्द झाला आणि ग्लॅडस्टनने मांडलेला नेमस्त ठराव पसार झाला. अफूचा व्यापार नीतीच्या दृष्टीने हीन असला, तरी या बाबतीत केवळ नैतिक तत्त्वांचा विचार करून चालणार नाही; तर आर्थिक व राजकीय विचारहि केला पाहिजे; हिंदुस्थानचे किती नुकसान होईल, प्रजेची काय दशा होईल, इतर अडचणी काय येतील, हें पाहिलें पाहिजे, असें त्याने प्रतिपादिले आणि तें पार्लमेंटने मान्य केलें; पण अशी गोष्ट घडणें हें अपवादात्मकच.
 'हिंदुस्थानचें राज्य कोणासाठी' या लेखांतहि आगरकरांनी इंग्रजांचा स्वार्थीपणा उघड करून दाखविला आहे. लिबरल पक्षाच्या कांही नेत्यांच्या मनांत ग्लॅडस्टनप्रमाणे हिंदुस्थानविषयी उदारपणाचे विचार येत असत; हिंदुस्थानांत यांत्रिक शिक्षणाची व कारखान्यांची वाढ व्हावी, राज्यकारभाराच्या निरनिराळ्या खात्यांत हिंदु लोकांना अधिकाराच्या जागा द्याव्या, सारांश, त्या लोकांची प्रगति व्हावी. असें त्या नेत्यांना वाटत होते; पण कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या लोकांना मात्र तें मंजूर नव्हतें. हिंदी लोकांना कोणत्याहि खात्यांत वरच्या जागा देऊ नयेत, कारखाने तेथे वाढू नयेत असेंच त्यांचें ठाम मत होतें; कारण त्यामुळे इंग्रजांचे वर्चस्व कमी झालें असतें. हिंदुस्थानचा फायदा होवो न होवो, त्यांना त्याची पर्वा नव्हती. इंग्लंडचा फायदा झाला पाहिजे, इंग्रजांचें राज्य कायम राहिलें पाहिजे हाच त्यांचा हेतु होता. त्यामुळे हिंदुस्थानांत इथल्या लोकांसाठी सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा ठेवण्यासहि त्यांचा विरोध होता. हिंदु लोकांनी राज्यकारभारांत शिरकाव करणें त्यांना मुळीच पसंत नव्हतें. कारण त्यामुळे तेवढ्या जागा इंग्रजांना कमी झाल्या असत्या व त्यांना चरायला रान कमी झालें असतें
 "इंग्लंड व हिंदुस्थान यांचा संयोग घडून आल्यापासून हिंदुस्थानचें कांहीच कल्याण झालें नाही किंवा हिंदुस्थानच्या लोकांस मुळीच न्याय मिळाला नाही, असें प्रतिपादणें म्हणजे केवळ कृतघ्नपणा होय, हें आम्हांस कबूल आहे; पण ज्या गोष्टींचा संबंध इंग्लंडच्या तिजोरीशीं, तेथील व्यापाराशी किंवा इंग्रजांच्या अन्य हिताहिताशी पोचत असेल अशा बाबतींत इंग्लंडने हिंदुस्थानचे कल्याण केल्याचें किंवा येथील लोकांस इंग्लंडपासून न्याय मिळाल्याचें क्वचितच उदाहरण दाखवितां येईल." आगरकरांच्या या विधानांत वरील सर्व विवेचनाचें सार आहे. साम्राज्यासाठी युद्धे, व्यापार, सिव्हिल सर्व्हिस या बाबतींत अन्याय झालाच होता. त्यांत कापडावरील जकातीबाबतच्या धोरणामुळे भरच पडली. रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे जी तूट येणार होती, ती भरून काढण्यासाठी सरकारने परदेशांतून
 के. त्रि. १३