Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १९१

सरकारला जास्त द्रव्य द्यावें, असा हुकूम काढण्यांत आला. ही नवीन प्रकारची सरंजामदारीच सरकारने सुरू केली होती.
 या युद्धांमुळे फायदा झाला इंग्लंडचा खर्च मात्र हिंदुस्थानचा. त्यामुळे प्राप्तीवरील कर व मिठावरील कर वाढवण्यांत आला. रुपयाचा भाव कमी झाल्यामुळेहि बोजा वाढला आणि अनेक वस्तु महाग झाल्या. अशा प्रकारे सर्व बाजूंनी लोकांचे दारिद्र्य वाढत गेलें.
 (३) इंग्रजांचे काळें अंतरंग - इंग्रज लोकांमध्ये कांही उदार वृत्तीचे पुरुष असले तरी, एकंदरीत ते लोक किती स्वार्थी व मतलबी होते याची आगरकरांना पूर्ण जाणीव होती. इंग्रजांच्या स्वार्थी धोरणाचें विवेचन त्यांनी 'तीन अर्थशास्त्रे' या लेखांत केलें आहे. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला व येथे आपले राज्य स्थापलें तें कांही हिंदी लोकांच्या कल्याणासाठी नव्हे, तर स्वतःच्या फायद्यासाठीच ते राज्य करीत आहेत आणि तें अगदी स्वाभाविक आहे, असें आगरकरांनी म्हटले आहे. त्यांच्या येथील राज्यामुळे हिंदुस्थानांतलाच नव्हे, तर सबंध आशिया खंडांतला बहुतेक व्यापार त्यांच्या हातीं आला आणि त्यामुळे तें राष्ट्र गबर झालें. त्यामुळे इथल्या लोकांचा व्यापार बंद झाला त्याची त्यांना मुळीच पर्वा नाही. या व्यापारामुळे त्यांचा अतोनात फायदा होतो, तो सोडायला ते कधीहि तयार होणार नाहीत. आगरकर म्हणतात, "आमचा सगळा व्यापार आमच्या हातीं फिरून पडूं देण्यापेक्षा आमचें राज्य ते आम्हांस अधिक आनंदाने परत देतील!"
 प्रजेची फारच हलाखी होऊन असंतोष वाढूं नये म्हणून राज्यकर्ते प्रजेच्या कल्याणाची चिंता वाटते असें दाखवतात; पण तें नाटक असतें. चौकशीसाठी कमिशन नेमावें, शेतकऱ्यांना थोडी सूट द्यावी, करांत थोडी सूट द्यावी, एखादा कालवा काढावा किंवा विहीर खणावी, बी-बियाणें वाटावें, गुरांचा दवाखाना काढावा, कोठे जंगलांतील गवत मोफत द्यावें, अशा प्रकारच्या क्षुल्लक सुधारणा करून, ते त्यांचा गाजावाजा खूप करतील, पण कापूस, धान्य, भिन्न धातु, यंत्रे यांचा व्यापार आमच्या हातीं यायला हवा, तो मात्र येऊ देणार नाहीत. काळजापर्यंत जाऊन भिडलेल्या जखमेवर नुसती मलमपट्टी करून कांही उपयोग होत नाही, चांगली औषधे द्यावी लागतात. व्यापार हेंच आमचें रक्तवर्धक औषध होय. पण राज्यकर्ते आम्हांला तें देत नाहीत. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, वगैरे स्वतंत्र देश आपापल्या व्यापाराला उत्तेजन व संरक्षण देतात तसे इंग्लंड देखील स्वतःच्या व्यापारासाठी मदत देते; पण हिंदुस्थानच्या बाबतीत मात्र 'सरकारने व्यापारांत हस्तक्षेप करूं नये' या सामान्य नियमाकडे सरकार बोट दाखवतें. तेलंग, रानडे, दादाभाई नौरोजी या शास्त्रज्ञांनी सरकारला आमच्या व्यापारास कशी मदत करता येईल तें सुचवले असले तरी; सरकार तिकडे लक्षच देत नाही. झोपेचें सोंग करणाऱ्याला जागे कसें करतां येणार! तसेंच या बाबतींतहि सरकारच्या विनवण्या करून कांही उपयोग होत नाही.