पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौदा । केसरीची त्रिमूर्ति

स्त्री-जीवन
 अंध आचारधर्म आणि विषम समाजारचना यांचे हीन जातींवर जसे अनिष्ट परिणाम होतात, तसेच स्त्रीजीवनावरहि अनिष्ट व घातक परिणाम होतात. स्त्रियांना अशा समाजांत जवळ जवळ शून्य प्रतिष्ठा असते. जुन्या धर्माने व रूढींनी स्त्रियांवर जीं असंख्य जाचक बंधने लादली होतीं, त्यांवरून सनातन धर्मशास्त्रकार स्त्रीला एक मानवी व्यक्ति मुळीच मानीत नव्हते, असें स्पष्ट दिसतें. पति मरण पावतांच पत्नीने सती गेलें पाहिजे, त्याच्या चितेंत स्वतःला जिवंत जाळून घेतलें पाहिजे, असें सांगणारा धर्म आणि स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध सक्तीने चितेत लोटण्याची रूढि यांच्या अधमपणाला व दुष्टपणाला सीमाच नाही. एखादी स्त्री पूर्णपणें स्वेच्छेने व केवळ पतिप्रेमामुळे जरी सती जात असली तरी, तिची ही कर्तव्यबुद्धि तामसच मानावी लागेल. स्त्रीस्वातंत्र्याच्या दृष्टीने 'सती' हा कोणत्याहि स्वरूपांत अधर्मच ठरतो. सतीच्या चालीप्रमाणेच पडदा-पद्धति, बालविवाह, विधवाविवाहबंदी केशवपन, स्त्रीशिक्षणाला विरोध ह्या सर्व नियमनांच्या मागे स्त्रीविषयीची तुच्छताच दिसून येते. या विकृत बुद्धीमुळेच त्या काळी स्त्रीच्या जीवनाला स्वतंत्र अर्थच राहिला नव्हता. स्त्री ही केवळ पुरुषाची पडछाया होती, संसाराचें एक साधन होती, भोगदासी होती. तिच्या मनाचा विचार न करतां तिच्या जड देहावर अनेक बंधनें घालण्यांत आली होती. पुरुषांवर मात्र तशी बंधने नव्हती.
 गेल्या शतकांतील समाजसुधारकांनी जातीय विषमतेविरुद्ध जशी मोहीम सुरू केली तशीच स्त्री-पुरुषविषमतेविरुद्ध हि तितक्याच निकराने चळवळ केली. राजा राममोहन राय यांनी सतीची चाल बंद करावी म्हणून लॉर्ड बेंटिककडे जो अर्ज केला होता त्यांत, शास्त्राच्या दृष्टीने किंवा सारासार विचाराने, कसेंहि पाहिलें तरी, सती म्हणजे स्त्रीचा खूनच होय, असें मत दिलें होतें. त्यांनी स्त्रीला दास्यांत ठेवणाऱ्या सर्वच रूढींविरुद्ध चळवळ सुरू केली होती; पण त्यांत त्यांना फारसें यश आलें नाही. सतीची चाल कायद्याने बंद झालेली पाहण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले.
 स्त्रीदास्य नाहीसे करण्यासाठी पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी जे प्रयत्न केले त्यांना फार महत्त्व आहे. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी चाळीस शाळा काढल्या; आणि सर्व बंगालभर स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला. त्याचप्रमाणे त्यांनी विधवाविवाहाची चळवळ करून १८५६ साली विधवा-विवाहाचा कायदा सरकारकडून करून घेतला. ब्राह्म-समाजाचे पुढारी केशवचंद्र सेन यांनीहि स्त्री-स्वातंत्र्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करून, त्यांत बरेंच यश मिळविलें.
 महाराष्ट्रांत १८५१ सालीं फुले यांनी पुण्याला मुलींची शाळा सुरू केली. विष्णुशास्त्री पंडित यांनी जुन्या शास्त्राचें मंथन करून त्यांतून विधवा-विवाहाला शास्त्राधार काढला व त्यासाठी महाराष्ट्रांत मोठी चळवळ केली व स्वतः पुनर्विवाहहि केला.