पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बारा । केसरीची त्रिमूर्ति

प्रार्थनासमाज
 डॉ. भांडारकर व न्या. रानडे हे प्रार्थनासमाजाचे थोर आचार्य होते. ते अव्यक्त परमात्म्याची उपासना करीत असले व मूर्तिपूजेच्या विरुद्ध असले तरी, ते परमेश्वराला सगुण मानीत. मात्र त्यांनी देवपूजेबरोबर रूढ झालेल्या अनिष्ट आचारांचा निषेधच केला आहे. कारण त्यामुळे देवाची केवळ विटंबना होते, आणि लोक प्रपंचकदमांत रुतून पडतात, असें त्यांचें मत होतें.
समता
 मानवाची प्रतिष्ठा जागृत करण्यासाठी गेल्या शतकांतील सुधारकांनी त्या प्रतिष्ठेचा पहिला शत्रु जो अंध आचारधर्म त्यावर प्रथम टीकास्त्र सोडलें, हें आपण पाहिले. त्या आचारधर्माइतकीच आपल्या समाजरचनेच्या बुडाशीं असलेली जन्मनिष्ठ उच्चनीचता मानवी प्रतिष्ठेला विघातक आहे, ती विषमता नष्ट करून समतेच्या पायावर समाजाची पुनर्घटना केली पाहिजे, हा विचार राजा राममोहन राय यांनीच प्रथम सांगितला. मात्र त्या क्षेत्रांत त्यांनी जोराची चळवळ केली नाही. ती पुढे केशवचंद्र सेन यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. त्यांनी ब्राह्मसमाजामार्फत अनेक भिन्नजातीय विवाह घडवून आणले व त्यांना मान्यता मिळावी म्हणून १८७२ सालीं सरकारकडून तसा कायदाहि करवून घेतला.
 जातिभेदाचा नाश करण्याचा पहिला प्रयत्न महाराष्ट्रांत दादोबा पांडुरंग यांनी केला. १८५० साली त्यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेंत सर्व जातींच्या व धर्माच्या लोकांना प्रवेश असे. सभासद होतांना प्रत्येकाला प्रथम 'मी जातिभेद मानणार नाही' अशी प्रतिज्ञा करावी लागे. पण त्या सभेचें काम गुप्तपणे चाले. त्यामुळे दादोबांच्या प्रयत्नाला व्यापक स्वरूप आलें नाही.
 जन्मनिष्ठ विषमतेवर लोकहितवादींनी केलेला भडिमार त्या काळांत अपूर्वच मानला पाहिजे. त्यांतहि त्यांनी एकंदर ब्राह्मण जातीवर हत्यार धरल्यामुळे, त्या समाजाची दृष्टि अंतर्मुख होऊन त्याला आत्मनिरीक्षणाचें बाळकडूच मिळालें. गेल्या शंभर-दीडशे वर्षांत इतर जातींनी ब्राह्मणांना जितक्या शिव्या दिल्या, त्यांपेक्षा किती तरी जास्त शिव्या ब्राह्मणांनीच स्वजातीला दिल्या आहेत. समाजांत जागृति कायम राहण्यासाठी अशा तऱ्हेचें कठोर आत्मपरीक्षण अवश्यच असतें व त्यांचें श्रेय लोकहितवादींना दिलें पाहिजे. "जे ब्राह्मण ज्ञानशून्य आहेत, ते कैकाड्यासारखे असून, कैकाडी सुधारले तर ब्राह्मणांसारखेच मानावे" म्हणजेच ज्याच्या त्याच्या गुणकर्मावरून वर्ण ठरवावा, असें त्यांनीं प्रतिपादिले आहे. "ब्राह्मणांनी आपल्या मूर्ख समजुती सोडून देऊन लोकांस सारखें मानून विद्या शिकण्याचा हक्क सर्वांना आहे, हें त्यांनी कबूल करावें,-", असा उपदेश त्यांनी केला आहे.
 लोकहितवादींच्याइतकेंच समतेचें आग्रहाने प्रतिपादन करणारे दुसरे गृहस्थ म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी हे होत. साम्यवादाचा पुरस्कार करून त्यांनी समतेची