पान:काशीयात्रा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रदेशतिले लोक येथे दरसाल यात्रेस येतात. येथे मुख्य ब्राम्हण यमुनेचा तीर्यसंबंधी विधी करविण्याकरितां म्हटले म्हणजे चौबे म्हणजे चाहूवदी हे आहेत. त्यांचेच काय तें मुख्य प्राबल्य, हे सुमारे चार हजार आहेत.एकंदर वस्ती सुमारे सवालाख पासून दीड लाख आहे.त्यांत मोठा भरणा मारवाड्यांचाच आहे.हे लोक कोट्याधीश सावकार आहेत.येथे सुमारे २५ देवळें एकेकास दहा पासून वीस लक्ष रुपये खर्च झालेले अशा प्रकारची आहेत. येथें लक्ष्मीचंद म्हणून एक मोठा सावकार होऊन गेला. त्याने येथे कोटयावधी रुपये खर्च केले आहेत. व धर्मशाळा आणि देवालये बांधलेली आहेत. हल्ली ह्याचा मुलगा आहे. त्याची ही पेढी मोठी आहे. दानधर्म मोठा आहे. येथील ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या सर्वांस घोंडे भरतपूर आणि जयपूर ह्या प्रांतांतून आणिलेले आहेत. हे धोंडे कुरंदाच्या जातीचे असून कोरीव काम करण्यास फार मऊ लांकडापेक्षां ह्या घोडयावर येथे कोरीव काम फार सफेदार होतें. संगमरवरी दगडाची कामेही इकडे पाहण्यासारखी आहेत.

 येथून तीन कोसावर उत्तरेस वृंदावन आहे.ते राधेचे सासर होतें. तेथे श्रीकृष्ण विहारास गोकुळांतून जात होते.वृंदावनास सुमारे हजार पंधराशे देवळे आहेत. त्या सर्वांची तहा मथुरेच्या देवळाप्रमाणेच आहे. येथे मथुरेतील लक्ष्मीचंदानी एक देवालय बांधिले आहे.त्यास सुमारे पन्नास लाख रुपये लागले असावे असे वाटते.त्याप्रमाणेच बाबूलाल बिहारी म्हणून एक बंगाली बाबू आहेत. त्यांनी सुमारे चाळीस लाख रुपये खर्च करून एक संगमरवरी दगडाचें कृष्ण मंदीर बांधिले आहे. हे पाहण्यासारिखें आहे. ह्या देवालयांतून मोठ मोठाले बगीचे फार चांगले आहेत. व तलावही मोठे आहेत. आंत नावेतून विहार करितां येतो.ही मंदिरें पाहून चित्तास जो आनंद होतो त्याचे कथन अनिर्वाच्य आहे.. मुंबईकडील व पुण्याकडील हवेल्या ह्यापुढे तृणप्राय आहेत.