Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१

अशी संज्ञा आहे. ह्या दरएक खान्यांत जरी दहा मनुष्यें बसण्याची जागा असते तरी जर एकाद्यास तो सगळा दरजा घेणे असेल तर सहा मनुष्यांचे भाडे द्यावे आणि "रिजर्व" करून घ्यावा. असा रिजर्व करून एकादा अगर ज्यास्त दरजे हवे असतील तितके घेतले म्हणजे त्यांत आपलीच काय ती मंडळी बसते. दुसरे परकीय कोणी येत नाहीत, ह्यामुळे बायका मनुष्ये घेऊन अदबशीर रीत्या बसण्यास चांगले पडतें. ह्याकरितां तसा दरजा ज्याची ५/६ माणसे असतात ते घेतात. परंतु तो मिळण्याची जी पंचाईत आहे तिचा जेव्हां जातीने अनुभव घ्यावा तेव्हांच इंगित कळते. नाहीपेक्षा कळण्यास कठीण. ज्यास दरजा रिजर्व करणे असेल त्याने लहान स्टेशनावर पूर्वी ४८ तास आणि मोठया स्टेशनावर पूर्वी २४ तास व कांही विशेष स्टेशन आहेत तेथे पूर्वी सहा तास नोटिस दिली म्हणजे मिळेल, असा ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीने नियम केला आहे. ह्या नियमाप्रमाणे कोणी ती नोटिस देण्यास प्रथमतः गेला म्हणजे तेथील शिपाई लोक वगैरे म्हणतात की, "आछा कुच फिकीर नही. तुमको हम एक पलखने दरजा रिजर्व करवा देयेंगे. जाव तुम अबी मकानपर" ह्यावर समाधान न पावतां जर कोणी स्टेशन मास्तरास नोटिस दिलीच तर मग जेव्हां दरजा रिजर्व करण्याची वेळ येते तेव्हां बुकिंग क्लार्क जे बाबू त्यांच्या हातीं संधी येते. मग त्यांजकडे दरजा रिजर्व करून द्या ह्मणून मागावयास गेलेना गेले म्हणजे ते प्रथमतः "गाडीमे दरजा खाली होगा तो गाडी आई बाद हम तुमको पास देयेंगे" असे उत्तर सांगतात. तेव्हां यात्रेकरू मोठ्या प्रतिष्ठेनें बाबूजवळ बोलू लागतो कीं, बाबूजी "हमने परसूं इस दरजेके वास्ते स्टेशन मास्तरसाबकू नोटिस दियाथा" असे बोलतांच बाबू म्हगतात की, जाव "तुम स्टेशन मास्तर साबके पास" इतके यात्रेकऱ्याशी बोलून शिपायाला हाक मारून त्याला विचारतात की, क्यौं तुम कैसा गाफिल अदमी है, बाहेर-