बाबूंचें थोडेंसें वर्णन करितों. त्यांत कदाचित एखादे ठिकाण बाबू इतक्याच शब्दानें निर्वाह करूं तर ती गोष्ट रेल्वेवरील अगर इतर संभावित वास्तविक बाबूंस लागू नाही असे समजले पाहिजे. सारांश काय म्हणाल तर झालेल्या बाबूंची ही गोष्ट आहे. प्रथमतः स्टेशनावर म्हणजे रेल्वेच्या हे अध्यारित घ्यावयाचेंच. नौकरी लागली म्हणजे हिवाळ्यांत आधी बाबूस एक दुलई पांधरावी लागते व चरस म्हणजे गांजाचा अर्क ह्याचा हुक्का ओढावा लागतो. तो हुक्का कशाचा म्हणाल तर श्रीफलाचें बेलें, देवनळाच्या दांडीवर चिलीम, आपल्या तिकडील रंगाऱ्याच्या येथे सतेली असतात त्या घाटाची आणि बेल्याच्या भोंकास वर ओठ लावून बाबू गुड गुड ओढितात. मग काय विचारावयाची बाबूची चैन. मुलाच्या पायांत साक्स असून बूट असतात. व स्वारी १॥ हाती पंच्या नेसून सोगा खालीं सोडून डोकीवर इकडील किरिस्तवाप्रमाणे केस राखून आंगावर दुलईच्या आंतून एक आंगोछा वेष्टून उघड्या माथ्यानें स्टेशनावर गाडी जाण्याच्या अगर येण्याच्या वेळी फिरूं लागते.
प्रयागाहून दिल्ली वगैरेकडे गाडी जाऊ लागली म्हणजे तो प्रांत प्रयागच्या पश्चिमेस आहे म्हणून तिला "पछाहाकी गाडी" असे म्हणतात. त्याप्रमाणे कलकत्ता वगैरे पूर्वेस आहे म्हणून तिकडे जाणारी अगर तिकडून येणाऱ्या गाडीस "पूरभ गाडी" असे म्हणतात. ह्या बाबूंची नावें भलीं लांब लांब असतात- बाबू राजेंद्र कुमार, बाबू शिवचरण प्रसाद अशा प्रकारची. आणि ह्या कृपाळू गृहस्थाची आणि टिकिट विकत मागणाऱ्या प्रवाशाची गांठ पडली म्हणजे फजितीच.
ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीने ज्या तिसऱ्या क्लासाच्या गाड्या केल्या आहेत त्या प्रत्येकींत समोरासमोर दोन चाकांवर दहा मनुष्ये बसतील इतक्या जाग्याचा एक भाग असे वेगळे वेगळे भाग केलेले आहेत. ह्याला हिंदुस्थानी भाषेनें "दरजा" अथवा "खाना"
पान:काशीयात्रा.pdf/४३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०