पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याचबरोबर सारा मुसलमान समाज हा १९४७ च्या मनोभूमिकेत वावरत असल्याचे गृहीत धरण्याचा मूर्खपणा करूनही आपण त्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणू शकणार नाही. आज त्या समाजातही विचारमंथन सुरू झाले आहे. नेटकी, अचूक दिशा दाखविण्याचे सततचे प्रयत्न त्या समाजातील काही माणसे जिद्दीने करीत आहेत, त्यांची दखल घेतली गेली पाहिजे; नव्हे, त्यांना बहुजन समाजाने पाठिंबा दर्शविला पाहिजे. अखेर सर्वांबद्दल अविश्वास दर्शविल्याने आपण काहीच साध्य करू शकणार नाही.
 आज मुसलमान समाजात विविध प्रवृत्ती अस्तित्वात आहेत. पाकिस्तानविषयीचा जिव्हाळा तर आहेच आहे. (तो केवळ आपण संतापून नष्ट होणार नाही. आपल्या कल्याणाकरिता पाकिस्तानची आवश्यकता आहे, असे मानणाऱ्या समाजाची पाकिस्ताननिष्ठा- ती कितीही चुकीची, राष्ट्रीय निष्ठेशी विघातक आणि संतापजनक असली तरी- समजून घेतली पाहिजे. ती नष्ट करायची असेल, तर पाकिस्तानबाबतीत वेगळे, खंबीरतेचे धोरण अमलात आणले पाहिजे. हिंदू देशबांधवच तुमचे हित आणि जीवित सांभाळतील, पाकिस्तान नव्हे; हे पाकिस्तानला प्रतितडाखे देऊनच आपण सिद्ध करू शकू, त्या समाजावर संताप काढून नव्हे!) सर्वसाधारणपणे- काँग्रेसच्या पाठीशी राहण्याकडे आज मुसलमान समाजाचा कल आहे. परंतु त्यांच्यातील एकसंध वृत्तीही संपलेली नाही. त्याचबरोबर तिचा आविष्कार होण्याचे त्या समाजाच्या एकसंधत्वाचे सामर्थ्य लयाला गेले आहे. एक प्रकारच्या पराभूत मनोवृत्तीत ती आज वावरत आहे. मुसलमान समाज अद्याप जातीयवादीच आहे. तथापि, आक्रमक जातीयवाद आणि बचावात्मक जातीयवाद यांच्यातील फरक आपण ओळखला पाहिजे. एखाद्या समाजाच्या चुकीच्या निष्ठा जेव्हा बचावात्मक पवित्रा धारण करतात, तेव्हा त्यांना आता तडे जात असल्याची विदारक जाणीव त्या समाजाला होऊ लागली असल्याचे हे लक्षण आहे. त्यांच्यातील भ्रमनिरास झालेल्या नव्या पिढीला आपण जवळ करायला हवे, कारण त्याखेरीज त्यांच्यात नव्या मनोवृत्तीचा उदय होऊच शकणार नाही.

 'अल्पसंख्याकांचे अधिकार' म्हणून जे काही मागण्यात येते, ते अतिशय अवास्तव आणि चुकीचे असते. अल्पसंख्याकांचे अधिकार तरी कोणते? माझ्या मते, अल्पसंख्याकांना धर्म (म्हणजे धर्माची अध्यात्माची जी बाजू आहे, तेवढ्यापुरता) पाळण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि तो अल्पसंख्याक असल्यामुळे त्याला कुठली संधी नाकारली जाता कामा नये; याखेरीज कोणत्याही वेगळ्या मागणीचा कधी विचार केला जाता कामा नये. कारण या मागण्या आपली अलिप्तता अथवा वेगळेपणा कायम टिकविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असतो.

३८ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा