पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेऊ शकू, असा जीनांचा कयास असावा, असे समजावयास आधार आहे. भारतात संस्थानांचे त्वरित विलीनीकरण झाल्याने जीनांच्या या आकांक्षांना तडे गेले. पाकिस्तानचे आजचे भारताविषयीचे वैर हे या भ्रमनिरासातूनही उद्भवलेले आहे.
 भारतातील हिंदू-मुस्लिम संबंधांचा या साऱ्या परिस्थितीतून विचार करायचा, तर तथाकथित मुस्लिम राष्ट्रवादी नेतृत्वाचे अपयश ठळकपणे नजरेत भरते. मुसलमान समाजाला हे नेतृत्व एके काळी वेगळ्या राष्ट्राच्या जाणिवेपासून परावृत्त करू शकले नाही, तर स्वातंत्रोत्तर काळात उर्वरित भारतातील मुसलमानांना बहुजन समाजाच्या आशा-आकांक्षांशी ते समरस करू शकले नाही. याचे कारण ते सनातनी, परंपरागत होते आणि आहेत, हेच होय. मुसलमानांच्या वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला ते विरोध करीत होते, एवढ्या अर्थाने ते नेतृत्व निश्चितच राष्ट्रवादी होते. याचा अर्थ, ते भारतीय राष्ट्रवादाची कल्पना मान्य करीत होते, एवढाच होतो; परंतु या नेतृत्वापाशी वेगळेपणाची जाणीव होतीच. ते मुसलमान म्हणूनच स्वत:चा विचार करीत होते. मुसलमान समाजाचा वेगळेपणा त्याला कायमच ठेवायचा होता. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्वकाळी जातीय मागणीला विरोध करीत असल्याचे दिसणारे हे नेतृत्व स्वातंत्र्योत्तर काळात स्वत:च जातीय बनल्याचे दृश्य आपल्याला दिसून आले. याचा परिणाम मुसलमान समाज त्या जुन्याच कल्पनांत गुरफटून राहण्यात झाला. त्याला जुन्या परंपरागत धार्मिक कल्पनेतून आता मुक्त केले पाहिजे.
 हे कार्य आपण कसे पार पाडणार आहोत?

 मुसलमानांना उपेक्षिततेने वागवणाऱ्या चातुर्वर्ण्याची चौकट आता खिळखिळी झाली आहे, परंतु मुस्लिम परंपरागत मनोवृत्तीला मात्र अद्याप धक्का लागलेला नाही. तिच्यावर आघात केले जाण्याची आता आवश्यकता आहे आणि ते परंपरागततेचा त्याग केलेल्या मुसलमानांनीच केले पाहिजे. मुस्लिम स्त्रियांची चळवळ हा असा आघात करण्याचा एक अल्प प्रयत्न! आपल्या खऱ्या अथवा काल्पनिक गाऱ्हाण्यांचा बागुलबुवा उभा न करता बहुजन समाजाच्या इच्छाआकांक्षांशी समरस होण्याची प्रवृत्ती मुसलमान समाजात निर्माण होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू समाजाने मुसलमानांना अनुदारतेने वागविले, असे मानायला काही आधार नाही. त्यांच्या विरुद्ध दंगे झाले असतील, तर ती त्यांनीच पाकिस्तानच्या प्राप्तीसाठी सुरू केलेल्या दंगलीच्याच चक्राची प्रतिक्रिया होय. दुखावलेल्या अंत:करणाने अलिप्ततावादाची जोपासना करून दंगे थांबणार नाहीत. हिंदू समाजाच्या मनात बसत असलेला अविश्वास कृतीने नष्ट केल्याने आणि त्यांचा विश्वास संपादन करूनच मुसलमानांना स्वत:चे रास्त स्थान प्राप्त करून घेता येईल.

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ३७