“ वेडी आहेस तू. हसून दाखवू ?”
“ शिरीष, जीवन म्हणजे का नाटक ?”
“ थोडेसे नाटकच. आपापले शोक, पश्चात्ताप, दुःखे सारे गिळून जगात वावरावे लागते. आपले खरे स्वरूप जगाला संपूर्णपणे दाखवता येत नसते. ते दाखवणे बरेही नव्हे. आपल्यालाही स्वत:चे संपूर्ण स्वरूप पाहायचा धीर होत नसतो. हे जग म्हणजे परमेश्वराचे मोठे नाटक. ह्या मोठ्या नाटकात आपण आपापली लहान लहान नाटके करीत असतो "
“ शिरीष, तू आहेस मुख्य प्रधान. मला नाही समजत असली गहन गंभीर गूढे.”
“ तू मुख्य प्रधानाची मुलगी आहेस. तू मागे एकदा मला अनुतीर्ण केले होतेस. तू माझ्यासाठीच देवीला नवस का केलास ते मला सांगता आले नव्हते.”
“ शिरीष, तुला मी एक विचारू ?”
" विचार."
“ तू रागावशील. ”
“ हेमा, मी तुझ्यावर एकदाच रागावलो होतो. दुष्काळात खीर केलौस म्हणून. एरवी कधी रागावलो होतो का? खरे सांग. तू मात्रः अनेकदा रागावली आहेस.”
“ शिरीष, बायकांचा राग खरा का असतो ? पुरुषांच्या रागाची जशी भीती वाटते, तशी बायकांच्या रागाची वाटते का ? बरे, ते जाऊ दे. तुला एक विचारते हा.”
“ विचार."
“ मला अद्याप मूलबाळ नाही, म्हणून का तू दुःखी आहेस ? खरे सांग. होय ना ? पण मी काय करू ? शिरीष, तू दुसरे लग्न करतोस ? मला वाईट नाही वाटणार. मी पाहू तुझ्यासाठी सुंदरशी मुलगी ? हे काय ? रागावलास ?”
“ काही तरी विचारतेस.”