♣ * * * * * * ♣
“हेमा,येतेस ना?” आदित्यनारायणांनी विचारले. “ मी नाही येत !” ती म्हणाली.
“ साऱ्या राज्यातील तरुण येथे जमले आहेत. तुला कोणता पसंत पडतो बघ. हेमा, तू आमची एकुलती एक मुलगी. तुझे सुख ते आमचे. तू नेहमी लग्न नको असे का म्हणतेस ? तू अशी विरक्त का ?”
“ तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. उद्या माझे लग्न झाले, म्हणजे मला येथे थोडेच राहाता येणार आहे? तुमचा तर माझ्यावर जीव.”
“ परंतु तुझ्या पतीला घरजावई करीन.”
" त्यांना न आवडले तर ? त्धांना त्यात मिधेपणा वाटला तर ?"
“ तुझ्या पतीला येथे मोठी नोकरी लावून देईन.”
“ परंतु त्यांना नको असली तर नोकरी ? येथे राहाणे नको असेल तर ?"
“ हेमा. येथे जे तरुण आले आहेत, ते उगीच नाही आले. महत्त्वाकांक्षेने आले आहेत. त्यांना राजधानीत मोठी नोकरी मिळाली, तर का आवडणार नाही ? बुद्धिमान लोक महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या बुद्धीची प्रभा सर्वत्र फाकावी असे त्यांना वाटते. मी तुला एक विचारू ?”
"काय?"
“ह्या जमलेल्या तरुणांत जो पहिला येईल त्याच्याशी तू करशील का लग्न ? जो पहिला येईल त्याला राजा प्रधान करील. म्हणजे मग तूही येथेच राहाशील. तुझी व आमची नेहमी भेट होत जाईल. चालेल का ?”