पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्या दिवशी ती बाहेर पडली शिल्पाकडे जाते म्हणून.
 आई म्हणाली, "आज काय विशेष?"
 "विशेष काही नाही, कॉलेज सोडल्यापासून ती फारशी भेटतच नाही ना, म्हणून अधूनमधून जायचं गप्पा मारायला."
 आईने तिच्याकडे जरा रोखूनच पाहिलं पण ती न थांबता सायकल काढून गेली तशीच. इतके दिवस रणजित आपल्याला भेटतो हे काही ना काही स्वरूपात आईच्या कानावर गेलंच असलं पाहिजे. लहान गावात काही लपून राहू शकत नाही. नाही तरी तिला लपवाछपवी करायची घृणा होती. तेव्हा असं भेटत राहणं बास असं तिनं त्याला सांगायचं ठरवलं होतं. तो तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं काही सांगणार ह्याची तिला कल्पना आली होता. त्याशिवाय मुद्दाम असं भेटायला बोलावण्याचं काही प्रयोजनच नव्हतं. तो असं म्हणाला तर आपली प्रतिक्रिया काय असावी ह्याचाही तिनं खूप विचार केला. आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिला त्याच्याबद्दल काहीतरी आकर्षण वाटत होतं.
 तरीसुद्धा त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे ती ठरवू शकली नाही. शिवाय प्रेमाबिमाचं बोलला तरी पुढे काय? प्रेमाची परिणती दुसऱ्या कशात व्हायची असते? पण त्या वाटेवर इतके अडथळे होते की ती त्याचा विचारच करु शकत नव्हती. शेवटी ह्या नात्यात काही भविष्य नाही, ते इथेच तोडून टाकलेलं बरं असं त्याला सांगायचं तिनं ठरवलं. आणि मग त्यानं एकदमच तिला "तू माझ्याशी लग्न करशील का?" असं विचारलं तेव्हा ती स्तब्ध झाली.
 "काही बोलत का नाहीस? तुला आवडलं नाही का मी असं विचारण?
 "तसं नाही."
 "मग बोल की. तुझं उत्तर 'नाही' असलं तरी सांग."
 "तसं नाही." आपण पुन्हा तेच बोललो असं जाणवून ती जराशी हसला "तुम्ही एकदमच बाँब टाकला. मला विचार करायला वेळ द्या. तुम्ही तरी पुरेसा विचार केलात का?"
 "अनुजा, मी पुष्कळ विचार केलाय. मला तू फार आवडतेस. तुझं दिसण, बोलणं, वागणं सगळंच मला आवडतं. मला तुझ्याबद्दल जे वाटतं ते दुसच्या कुणाबद्दल कधी वाटलेलं नाही."
 त्यानं तिला प्रथमच नावाने हाक मारल्याने तिच्या अंगावर रोमांच उठले.

कमळाची पानं । १६४