पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संबंध जवळजवळ तोडलेच होते.
 तिला मुलगा झाला, आणि लगेच दोन वर्षांत दुसरा मुलगा झाला. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तिनं नोकरी सोडली ती सोडलीच. आता दोन मुलं संभाळून नोकरी करणं शक्य नव्हतं. एका तऱ्हेनं तिला बरं वाटलं, कारण ती कुठे जाईनाशी झाल्यावर सिद्धार्थाचा तिच्या मागचा ससेमिरा थांबला होता. तिची मिळकत थांबली म्हणून त्यानं एका शाळेत नोकरी धरली. नोकरी आणि बाकीचे व्याप ह्यात तो फारसा घरी नसे, पण जेव्हा असे तेव्हा पहिल्यासारखा आनंदी, समाधानी असे. परिस्थिती बदलली तर काय होईल असा विचार तिला कधी कधी सतावायचा, पण तो ती निग्रहाने दूर सारायची. पुढचं पुढं बघू.
 आणि एकदम अनपेक्षित दिशेनंच हल्ला झाला. एक दिवस सिद्धार्थाचा एक मित्र आला होता. नेहमी घरी येणारा. पुष्कळदा तो सिद्धार्थ घरी नसला तरी यायचा, तसाच त्या दिवशी थांबला. खरं म्हणजे मनीषाला सिद्धार्थ नसताना त्याचे मित्र येऊन बसलेले आवडायचे नाहीत. एक तर जागा फार लहान होती. कुणीतरी परका माणूस समोर आहे, कदाचित आपल्या सगळ्या हालचाली त्याच्या नजरेनं टिपीत असेल ह्या कल्पनेनं तिला कुचंबल्यासारखं व्हायचं. एकदा तिनं सिद्धार्थाला सांगून बघितलं पण त्यानं मनावर घेतलं नाही. "लग्न व्हायच्या आधीपास्नं ते माझं घर आपलंच समजून वागत आलेत. आता एकदम मी त्यांना नाही म्हणून कसं सांगू?"
 त्या दिवशी सिद्धार्थाला यायला फारच उशीर झाला. रात्र गडद झाली. मुलांना जेवू घालून तिनं झोपवलं. किशोर वाचत बसला होता. शेवटी ती म्हणाली, "तू किती वेळ थांबणार आता? उद्या का नाही येत?" तो म्हणाला, "आता इतका वेळ थांबलोय आणखी थोड्या वेळानं काय होणार आहे?"
 सिद्धार्थ आला आणि नेहमीप्रमाणे किशोरला जेवून जा वगैरे न म्हणता त्याची केली दहा मिनिटांत बोळवण. मग जेवण होईपर्यंतसुद्धा न थांबता तो "म्हणाला, "किशोर काय करीत होता इतक्या उशीरापर्यंत?"
 "नेहमीसारखा तू यायची वाट बघत थांबला होता."
 "इतकी रात्र होईपर्यंत त्याला कशाला बसवून घेतलंस?"
 "मी बसवून घेतलं नाही, तो आपणहून बसला."
 "चांगल्या गप्पा तर मारत होतीस त्याच्याशी."
 "मग काय हरकत आहे? इतके दिवस तो इथं येतोय, आता तो माझाही

कमळाची पानं । १३३