पान:कथाली.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "झ्याक जमलं गं, पन कुंकवाचे धनी तीन दिवसांत फिरकले न्हाईत गं? कळविलं असंल की, डोंगरातल्या पाथरीच्या साळंत हायेत की रस्त्यावरल्या काळापुरीच्या साळंत?" बोलता बोलता त्यांनी तुळशीची माळ चाचपीत होत जोडले होते. हे सारे आठवून सुशीलाचे डोळे भरून आले.
 जिजी आता घोरायला लागल्या होत्या. त्या गाढ झोपेतही नागमोडी आठवणींचे भिरभिरे डोळ्यासमोर फिरतच होते.
 "लगीन झालं तवा जेमतेम बाराची असंल म्या. न्हाणबी आलं नव्हतं. घरात मोठ्या मायला मदत करायची. सागरगोटे, काचापाणी, ठिकरी खेळण्यात येळ उडून जाई. नाना, मायचे वडील लिंबाळ्याला वसुलीला गेलेवत्ते, नवा यानूला त्यांनी पाहिलं. पंढरपुरात शिकाया होत्ये, हे थोरले, मग भैणी आणि आणि पुन्हा दोन भाऊ. थोरले बप्पा, यांचे वडील, ते घरात मोठे. धाकटे दोन भाऊ. तीन भावांचं खटलं एकत्र राही. तिघा भावात एकलगट चारशे एकर जमीन, सात हिरी, दोन आमराया, गाई, म्हशी, बैलं, दोन घोडी असा गोतावळा. 'नानांना हे घर शंभर नंबरी वाटलं. ते त्यांच्या गावाकडे जाण्याअगोदर लेकीच्या घरी, थेट आमच्या धानुऱ्याला आले. जावयाच्या वडलांना, म्हणजे आमच्या बापूंना सांगून नातीचं, माझं लगन पक्क करून टाकलं. अन् तुळसीचं लगीन झाल्या झाल्या पहिल्या लगीन तिथीला धानुऱ्याच्या देशमुखांच्या गढीत वाढलेली चंद्रभागा घरच्यांची लाडकी जिजी लिंबाळ्याच्या जाधव पाटलांच्या घरातली थोरली सून म्हणून. पंढरपुरात शिकणाऱ्या विठूची बायको म्हणून, अंगभर गुलाबी वलगट पांघरून, सांजच्या येळी, जवारीचं माप वलांडून वाड्यात आली.'
 लगीन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जिजीच्या काळ्याभोर घनदाट केसाचा अंबाडा आत्याबाईंनी. सासूबाईंनी बांधून दिला.

'लांब केसांची मालन, ऐन आषाढीचा चांद.
वर केवड्याचा फणा; माळते आत्याई.'

 अशी कौतुकाने ओवी गात आंबाड्यावर सूर्यचंद्राच्या पिना बशिवल्या. आत्याबाई सुनेच्या डोक्यावरून मायेने हात फिरवीत म्हणाल्या, "तुमी या वाड्यातल्या थोरल्या वैनीसाब आहात. आदबीनं राहायचं. कंदीकबार वाड्याभाईर जायाची येळ आली तर अंगभर वलगट ओढून जायचं. पुरुस मानसांसमोर ढाळजात जायचं न्हाई. तीन भावांचा बारदाना एकात आहे. चुलत मालत मानायचं नाही."

८२ /कथाली