"हो हो! पावसाळा संपला की, आकाश निरभ्र होतं. निळं निळं होतं. मग आपण गच्चीवर बसून नक्षत्र पाहू."
"आमच्या शाळेत बलूनमध्ये बसवून आकाशातली नक्षत्रं, तारे दाखवले होते ना! मी आणलंय ते पुस्तक." मुनूने लगेच उत्तर दिलं.
सविताच्या मनात शाळेतल्या शिक्षणाचा मुलांच्या मनात गोंदलेला प्रवास अधोरेखित झाला. तिनं लगेच उत्साहाने पुस्ती जोडली.
"मी आबुज्जांची दुर्बीण उद्या काढून ठेवते. मग मीही येईन गच्चीवर." हे सारं आठवून सविता सुखावली.
मुनूनं छोटे कांदे सोलून ठेवले होते. रोशने मिक्सीतून मसाला काढून ठेवला होता. सवितानं खिचडी फोडणीला टाकली. गप्पा मारता मारता जेवणं कधी आटोपली, नातवंडं कधी झोपली ते लक्षातच आलं नाही. रविवारीही निशी-संगीता, ऋजू-आश्विन दिवसभर आले होते. दिवस कसा संपला कळलं नाही.
"ममा, तू थकली आहेस. मुलांना आम्ही घेऊन जातो. किट्टूला तयार करून सकाळी पाठवतो. तू झोप आता." असं बजावून निशी, ऋजू आपापल्या घरी परतले.
सविताने दिवा मालवला. आडवी होऊन डोळे मिटून घेतले. मग स्वप्नांची मैफिल. सरकत्या. फिरत्या चित्रांची.
एक खोल खोल कृष्णविवर. त्या विवरावर गलेलठ्ठ जडबंबाळ घट्ट झाकण. जोर लावून तिनं ते उघडलं नि काय. त्यातून तऱ्हेतऱ्हेचे पक्षी बाहेर उडू लागले. पक्ष्यांचे चेहरे बायकांचे. पण कान, नाक, डोळे नसलेल्या बायांचे. मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर डोळे उगवले. रडणारे, नाहीतर वेदनांनी गच्च मिटलेले. तिनं निखून पाहिलं. त्यातला एक चेहरा आजोबांना घाबरून त्यांच्यासमोर येताना थरथरणाऱ्या मोठ्या आईचा होता आणि दुसरा चेहरा तिच्या आईचा, बाईचा. सावीचे बाबा कोर्टातून घरी येण्याआधी त्यांना अम्मा घरीच लागे. एकदाच पाच मिनिटे उशीर झाला, तर बाबांनी सगळ्यांच्या देखतं तिला दरडावलं होतं. तिच्या आईवडिलांचा उद्धार केला होता. अरुण ब्राह्मणच; पण कऱ्हाडे नि सावी देशस्थ. त्यांचा ओळखीतून विवाह. पण घरातून निघून जाऊन लग्न करावं लागलं होतं.
उगवते पिंपळपान / ७९