हव्यातच. व्हय संकर बाप्पा?" व्यंकप्पाच्या धाकल्या चुलतभावानं शंका काढली.
शेवटी भावकीतल्या, अंब्याच्या कालिजात जाणाऱ्या सचिन्याला त्याच्या फटफटीवर परळीला धाडायचं ठरलं. सचिन्याचा बाप पोराला सांगू लागला.
"आन् ह्ये बग सचिन्या, त्या बाईला म्हनावं यंकाप्पा लई शिरीयस हाय, आन् त्याला लई पच्चाताप व्हाया लागलाय, म्हणावं. तुमाले सोडून दिलं, पण तुमाला बगायचा ध्यास घेतलया म्हाताऱ्यानं." नाकात नसेचा बार भरून तो पुन्हा सांगाया लागला, "आन् रिक्षा ठरीव. पाच पन्नास लागले तर घे. त्या काकीलाच पैशे द्यायला सांग. न्हाई दिले तर खिशातलं काढ."
"बाया लई भोळ्या असत्यात. ती लगोलग येईल. जरा जास्त करून, मालमसाला लावून सांग. शिकल्याली पोरं तुमी. समदं समजतं तुमाले. अस्सा जा नि अस्सा ये." असं म्हणून सचिनच्या बापानं व्यकप्पाच्या भावकीतल्या भावानं, पोराला पिटाळलं.
एवढ्यात समिंदरा नवऱ्यासंगट आली. भोकाड काढून मायच्या गळ्यात पडली. जनाबाई केजाला ऱ्हाते. नवरा दुकानदारी करतो. ती नवऱ्यासंग फटफटीवर आली. थंडगार मढ्यावर पडून रडू लागली.
"बाप्पा असं कसं व झालं? माज्या भाबीला येकलं येकलं सोडून कसे गेला वो? आमी समदे पोरके जालो वो ऽऽ" नंतर उठून भामाक्काच्या गळ्यात पडून रडू लागली.
बाहेर बांधाबांध सुरू झाली. सगळं सामान फुलचंद मारवाड्याच्या दुकानातून आणायला सहदेव गेला.
आयाबायाही घरचं आवरून भामाक्काजवळ बसून रडू लागल्या. म्हाताऱ्या बाया तिच्या डोईवरून हात फिरवू लागल्या. भामाक्काने कपाळावरचा पदर डोळे झाकील असा ओढला नि ती खाली मान घालून मुसमुसू लागली.
दुपारचे १२ वाजले असतील. एक मोटारसायकल फाटकाबाहेर थांबली. बारकाबाईची चौकशी तो तरुण करीत होता. मीराने खुणेने त्याला आत सोडायला सांगितले. गुरख्याच्या ऑफिसात नोंदणी करून तो तरुण आत आला.