पान:कथाली.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पाचजणांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांच्या विविध प्रकारच्या सवयी, आवडीनिवडी. प्रत्येकाच्या पांचालीकडून तऱ्हेतऱ्हेच्या अपेक्षा. देहरंजनाच्या आणि देहबोलीच्या भिन्न भिन्न तऱ्हा. या सर्वांना सहन करताना तिची होणारी ओढाताण... त्या आठवणींनी द्रौपदी अस्वस्थ झाली. पाचही जणांचे द्यूत खेळण्याचे असोशी वेड... नेहमी होणारी हार, भोगावा लागलेला सततचा वनवास. जयद्रथ, दुःशासन, दुर्योधन, किचक यांची देह सोलून काढणारी हावरी नजर, अश्वत्थाम्याने केलेला तिच्या मुलांचा संहार लक्ष लक्ष, अगणित प्रहार. सखा श्रीकृष्णच मनातल्या व्यथा जाणणारा, सखी कृष्णेला धीर देऊन प्रत्येक वडवानळातून सुखरूप सोडविणारा. तो होता म्हणूनच...! पाच पतींसह सर्वच पांचालीच्या देहात अडकले. कुणी अधिकाराने उपभोग घेतला. काहींच्या डोळ्यात फक्त लालसा होती. त्या देहात असलेले उत्फुल्ल मानवी मन कुणालाच जाणवलं नाही. त्या मनावर होणारे आघात कोणी जाणले? अपवाद फक्त भीमाचा. किचकाने सैरंध्रीचा विनयभंग केला तेव्हा त्यानेच तिच्या अपमानाची परतफेड केली. आज तिच्या मनाला खूप शरम वाटते, तिने दुर्योधनाला दिलेल्या त्या उत्तराची. 'आज शेषाची नाही' हे सांगताना कळतनकळत मी भानुमतीचा अपमान केला होता. भानुमतीच्या काय किंवा माझ्या काय देहातच पतींसह सारे पुरुष गुंतले. आमच्यातल्या मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न कोणीच का केला नाही?... अपवाद श्रीकृष्णाचा. मी त्याची सखी होते...
 मी अग्नीकन्या होतेच. भळभळती जखम शोधणाऱ्या अश्वत्थाम्याच्या जखमेवर ती भरून यावी, यातना सहन व्हावी म्हणून अतीव मायेने मी तेल ओतले तेव्हा व्यासांनी मला भाविणी म्हणून साद घातली. दुःशासनाने माझ्या वस्त्राला हात घातला त्यावेळी मी भर सभेत पितामह भीष्माचार्यांना निर्भीडपणे प्रश्न विचारले. तेव्हा माझा त्यांनी 'मनस्विनी' म्हणून गौरव केला. महर्षी व्यासांना माझे घवघवते... चेतस मन जाणले. इतरांनी का नाही? का नाही?...? की देहस्विनीचा घाट पार केल्यानंतरच मी भाविणी, मनस्विनी झाले. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात ही तीन वळणे येतच असतील का?

* * *

 पायातल्या लाकडी खडावांचा कट्कट् असा ध्वनी त्या निबिड गहन वनात येत होता. काटे... वाळलेली पाने तुडवीत ती उत्तरेच्या दिशेने चालत होती. इतक्यात

४४ /कथाली