पान:कथाली.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी सूतपुत्राला वरमाला अर्पण करणार नाही. अंगददेशाचे राज्य मित्राच्या उपकारानेच प्राप्त झालेय ना? अखेर सूतपुत्रच!
 कर्णाने धनुष्य खांद्यावर अडकवले आणि तो वेगाने गर्रकन मागे वळून प्रवेशद्वाराच्या दिशेने निघाला. मात्र, त्याचा हृदयस्थ मित्र दुर्योधनाने मात्र विषगर्भ तीरासारखी नजर पांचालीकडे टाकली आणि आपली गदा घट्ट आवळीत स्वयंवर मंडपाबाहेर ताडताड पावले टाकीत तो निघून गेला. क्षणभर नीरव स्तब्धता...क्षणार्धात एक भरदार बाहूंचा गहूवर्णी युवक त्या मत्स्यचक्राकडे गेला आणि काही कळायच्या आत त्याने मत्स्यभेद केला. त्या ब्राह्मण युवकाला पाहून पांचालीच्या मनात आले. साक्षात् अग्नीने निर्मिलेल्या द्रुपदकन्येच्या प्राक्तनात क्षत्रीय राजपुरुष नांहीच का? सखी मृणालिनीने तिचा हात धरून तिला विवाह वेदिकेकडे नेले. द्रौपदीने त्या ब्रह्मकुमाराच्या गळ्यात वरमाला घातली आणि मंडपात कोलाहल माजला.... द्रुपदराजाचा धिक्कार असो. द्रुपदकन्येचा विवाह क्षत्रीय नृपतीबरोबर अथवा राजपुत्राशीच झाला पाहिजे. अन्यथा युद्धास तयार व्हा. अशा आरोळ्यांनी सभामंडप हादरून गेला. वासुदेवपुत्र श्रीकृष्ण तात्काळ व्यासपीठावर चढला आणि त्याने उंच आवाजात जणू आदेशच दिला. 'हे नृपती आणि राजपुत्रांनो, ज्ञाती जन्माने प्राप्त होत नाहीत तर कर्माने प्राप्त होतात ही पूर्वापार परंपरा, आर्यधर्माचे पालन क्रमशः करावे ही पूर्वजांची शिकवण विसरलात?
 श्रीकृष्ण, बलराम त्या ब्राह्मण कुमारास कडकडून भेटले आणि त्याच्यासमवेत नगराबाहेरच्या पर्णकुटीकडे आले. अर्जुनाने हर्षाने मातेला साद घातली.
 "माते, आज मी अपूर्व भिक्षा आणली आहे, ती पाहा..."
 "जी काही भिक्षा असेल ती पाचही जणं वाटून घ्या" असे म्हणत माता कुंती काष्ठगृहाच्या बाहेर आली तर समोर विलक्षण तेजस्वी रूपवान राजकन्या, तिला आपण दिलेल्या आज्ञेचा पश्चात्ताप झाला. परंतु मातृआज्ञा स्वप्नातही अव्हेरू नये या परंपरेनुसार पाचही जणांनी पांचालीशी विवाह केला. हस्तिनापुरातील राजगृहात जाण्यापूर्वी नारदमुनींची भेट झाली. वासुदेवाच्या विनंतीनुसार पांडुपुत्रात कलह माजू नये या उद्देशाने नारदमुनींनी प्रत्येक पांडवाने वर्षातून प्रत्येकी दोन महिने बारा दिवस पांचालीच्या सहवासात राहावे. जो ही खूण भंग करील त्याने एक वर्ष वनवास पत्करावा असा नियम घालून दिला... पांचालीला ते क्षण अनेक वर्षांनंतरही काल घडल्यागत आठवताहेत.

त्या तिघी / ४३