पान:कथाली.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हातावर मेंदी चढविन्याचा रुसूम... विधी करून ती तिला भैयाकडे सोडून परत आली.
 रिवाजानुसार सगळ्याजणी तुळशी वृंदावनाजवळच्या चौकात बधाईची गाणी, बन्नाबन्नी गीतं मध्यरात्र उलटून जाईपर्यंत गात होत्या. छल्लोजिजी तिचं आवडतं गाण गात होती. पण भवरुनाईच्या बायकोची ढोलकीची साथ नव्हती. तिचा हात थांबला होता.

'ऋत गर्मी में ब्याव रचायो।
खस का पंखाल्याओ जी बन्ना।
खस का पंखा रसरी बिनणी।
गेंदलासु गोद भराओ जी बन्ना।'

 मनहरभैयासाठी खसाच्या अत्तरासारखी सुगंधी... देखणी रसभरी 'बिन्नी' मिळाली होती. तिची ओटी... गोद फुलाफळांनी फुलून जाणार होती. पण छल्लोजिजीची! जिजीची ओटी मात्र रिकामीच राहिली होती. छल्लोचा आवाज किती करुण वाटला त्या दिवशी. खरंच करुण बनला होता की माझ्याच मनाची कल्पना.
 आणि वर्षावर वर्षे निघून गेली. ती कुठे कुणासाठी थांबतात? मनोहरला दोनही मुलीच. आणि मला दोनही मुलगे. माझ्या मुलांना खेळवतानाही माताजी अतृप्तच राहिल्या. आणि एक दिवस ती उदासी बरोबर घेऊन निघून गेल्या. बाबूजी मात्र नेहमीच खूश होते. ते असतानाच मनहरभैया आमदार झाले होते. अशोकही जिल्हाधिकारी झाला होता. बाबूजी ही एक दिवस गेले. आणि आता छल्लोजिजीही गेली.
 मनहरभैयाच्या पत्राला उत्तर काय लिहू मी? छल्लोजिजीचं मरण मला आणि मनहरभैय्याला किती सोलून गेलं हे अशोकला तरी कळणार आहे का? की पत्रच नको लिहू? शेवटी मी हातात पेन घेते आणि लिहून टाकते.
 "छल्लोजिजीच्या दुःखद निधनाची बातमी कळली. तुम्हा सर्वांच्या आणि तिच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
 ईश्वर मृतात्म्यास शांती देवो..."

३० /कथाली